म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
करोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सर्व आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना असतानाही आडगाव बुद्रुक (ता. सिल्लोड) येथे दर रविवारी बाजार भरविण्यात येत आहे. बाजार बंद ठेवण्याबाबत पोलिस प्रशासनाने पत्र दिल्यानंतरही काही कार्यवाही करण्यात आली नाही.
देशामध्ये करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्याचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने 'लॉकडाऊन'ची घोषणा केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये म्हणून दुकाने, बाजारपेठा बंद केल्या. आठवडी बाजार भरवू नयेत, असे आदेश काढले आहेत. त्यानंतरही आडगाव बुद्रुक येथील बाजार या आदेशाला अपवाद ठरला आहे. गेल्या महिनाभरात एकही रविवार न चुकता आठवडी बाजार भरविण्यात येत आहे. यामुळे आजुबाजुच्या गावांतील नागरिक येते खरेदी-विक्रीसाठी येतात. यावर प्रशासन व पोलिस यंत्रणेने कुठलीही कारवाई केलेली नाही. हे गाव वडोद बाजार पोलिस ठाण्यांतर्गत आहे.
बाजार भरवू नये, असे पत्र पोलिसांनी सुरुवातीला ग्रामंपायचतीला दिले होते. तरीही येथे रविवारचा बाजार कधीही बंद राहिला नाही. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर एकही रविवार आडगावात चक्कर मारली नाही. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र साधा बीट जमादार देखील आडगावात फिरकला नाही.
या बाजारात वाहेगाव, निधोना, डोंगरगाव, बाभुळगाव, पिंपळगाव, शिरोडी, बाबरा आदी गावांतून छोटे-मोठे व्यापारी व शेतकरी येत आहेत. बाजारावर कोणतेही बंधन नसल्याचे चित्र आहे. करोना विषाणू संसर्गामुळे भितीचे वातावरण आहे. या परिसरात निधोना व बाबरा हे मोठे बाजार पूर्णपणे बंद आहेत, मात्र आडगाव येथे संचारबंदीचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. एवढेच नाही तर मुख्य रस्त्यालगतच्या बस थांब्यावर रोज सकाळी आठ ते ११ यादरम्यान थव्याथव्याने नागरिक जमलेले असतात. सुरक्षित वावर करण्याचा नियम कोणी पाळत नाही. त्याचबरोबर मास्कही कोणी वापरत नाही.
सुरक्षित अंतर न पाळणे म्हणजे विषाणूला आमंत्रण देणे होय. याबाबत ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- शुभम पांडुरंग जगताप, सामाजिक कार्यकर्ते
'लॉकडाऊन'च्या काळात बाजार भरविणे अत्यंत चुकीचे आहे. संचारबंदीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. बाजारात खूप गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून आठवडी बाजार बंद करावा.
- ईश्वर संजय भुमे
रविवार असल्याने मी गावात आलो नाही. माझी आज सुट्टी होती. गावात बाजार भरला नसेल, परंतु भाजीपाला विक्रेते आले असतील. याबाबत मी सरपंचांना बोलतो.
- बी. कोळी ग्रामसेवक