म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल महिन्याभराच्या दीर्घ खंडानंतर सोमवारी (१७ सप्टेंबर) दुपारी दोनपासून पावसाने हजेरी लावली. सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात अर्धा ते पाऊण तास बरसलेल्या सरींनी शहर चिंब झाले.
चिकलठाणा वेधशाळेमध्ये केवळ १.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पावसाचा जोर होता. सिडको, हडको, चिकलठाणा, औरंगपुरा, चिकलठाणा, क्रांती चौक, निराला बाजार, हर्सूल, विद्यापीठ परिसरासह जुन्या शहरातही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, सोमवारी पाऊस बरसला. महिन्याभराच्या खंडानंतर झालेल्या पावसानंतरही अद्याप ग्रामीण भागामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.