म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॉलेजमध्ये ठेवलेले पहिले पाऊल, कॉलेज कट्ट्यावर मिळालेले मित्र-मैत्रिणी, करिअरला मिळालेली दिशा आणि आजची भरारी अशा जुन्या आठवणींमध्ये देवगिरी कॉलेजचे माजी विद्यार्थी रंगले. अकरावी ते पदवी पर्यंतच्या (१९८७-९२) या मित्र-मैत्रिणींचा हा गोतावळा २७ वर्षानंतर जुन्या आठवणींमध्ये रमला.
देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा 'देवगिरीयन्स ग्रुप'च्या माध्यमातून तब्बल २७ वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा जानकी हॉटेलच्या सभागृहात पार पडला. कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाल्याचे दिसत होते. या स्नेहमेळाव्यात शिक्षण, वैद्यकीय, राजकारण, पत्रकारिता, उद्योग, व्यवसाय आदी विविध क्षेत्रातील नामवंतांनी सहभाग घेतला. कॉलेजमधील आठवणी जागवताना तासिका, शिक्षक, कॉलेजचा तो कट्टा, एकमेकांना दिलेली टोपण नावे, आदी किश्श्यांमध्ये मित्र रमले.
आमदार अंबादास दानवे यांचा वाढदिवसही त्यांच्या वर्ग मित्रांनी साजरा केला. यावेळी दानवे म्हणाले, या ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आलो आहोत. पुन्हा पुन्हा आपली भेट होत राहील. प्रत्येकाच्या सुख दु:खात सहभागी होण्याचा निश्चय केला पाहिजे. म्हाडाचे विभागीय सभापती संजय केणेकर म्हणाले, अनेक जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद होत आहे. आपण सर्व प्रगतीच्या मागे लागतो. पण, त्यात माणसं हरवतात. त्या हरविलेल्या माणसांना तुम्ही एकत्र केले याचा आनंद आहे. या कार्यक्रमात गायक अतुल दिवे यांनी गझल सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी आमदार अंबादास दानवे, विनोद बंडावाला, संजय केणेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड, अजय तुपे, राजेश भंडारी, वैशाली बागुल, तिलोत्तमा झाडे, वसंत वडीकर, प्रा. संजय गायकवाड, कल्याण मोरे, अनिता कर्डेले, अर्चना कर्जतकर, अपर्णा आचार्य, नीती धनवे, शारदा दाभाडे, ज्योती थोरात, पृथ्वीराज पवार, रमेश पवार, अतुल दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा नाईक यांनी केले.
..