म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच झेंड्याखाली काम केले पाहिजे. प्रतिपक्ष अजिबात चालणार नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात माहिती कळविली आहे. त्यांनी सांगितले आहे, की संघटना स्थापन करायची असेल, तर खुशाल पक्षातून बाहेर पडावे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. काही जण गेल्याने काही फरक पडणार नाही,’ अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्ष नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला.
काही दिवसांपूर्वी आमदार सुभाष झांबड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनआंदोलन विकास समितीची स्थापना केली. काँग्रेसच्या आजच्या बैठकीसही ही मंडळी उपस्थित नव्हती. नामोल्लेख टाळून सत्तार म्हणाले, ‘समिती स्थापन केल्याबाबत मी वरिष्ठांना कळविले आहे. त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या माध्यमातून वैयक्तिक चूल कुणी मांडू नये. कारण आपण काँग्रेसच्या झेंड्याखाली आंदोलने, कार्यक्रम घेतले पाहिजेत. पक्ष सोडून संघटनेच्या माध्यमातून आंदोलने करणे चूक आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगूनही जर ते ऐकत नसतील, तर खुशाल राजीनामा द्यावा. तुम्हाला काही गैर वाटत असेल, तर श्रेष्ठींकडे तक्रार करा. मात्र, हा मार्ग योग्य नाही. पक्ष कधीही मोठा असतो हे विसरता कामा नये. लोकांमध्ये काय चाललय याची माहिती घ्या. गेस्ट हाऊस ते पुढारी असा संपर्क ठेवून काही मिळत नाही. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची गर्दी कमी नाही. सर्वपक्षीय नेते जमवून संघटना स्थापणे म्हणजे आपल्या पक्षावर विश्वास नाही असा अर्थ होतो. अनेक वेळा संघटनेच्या नावावर ब्लॅकमेलिंग केले जाते, हे लक्षात घेतले पाहिजे.’