औरंगाबाद : शहरात होणाऱ्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला २३ कॅबिनेट, १६ राज्यमंत्री आणि सचिव दर्जाचे सुमारे ४०० अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आठ वर्षांनंतर होणाऱ्या या बैठकीची प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे.
बैठकीच्या पूर्व तयारीसाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीसाठी आसन व्यवस्था, मंडप, पाण्याची व्यवस्था, ध्वनीक्षेपक, वातानुकूलित यंत्रणा, यासह शहरात येणारे मंत्री, अधिकारी यांच्या निवासाची व्यवस्था, परिवहन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदी विषयांवर चर्चा व संबंधित यंत्रणांना सूचना करण्यात आल्या. शहरातील रस्ते, वाहतूक नियंत्रण, दिव्यांची देखभाल व दुरुस्ती, विश्रामगृह आणि परिसराची स्वच्छता, पोलिस बंदोबस्त याबाबतही संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलिस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, अप्पर आयुक्त जी. एम. बोडखे, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड, प्रल्हाद कचरे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोगमारे अशा विविध अविभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दांगट, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवासासाठी विश्रामगृहांची, हॉटेल्सची पाहणी केली. दोन दिवसात ही व्यवस्था पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत १ ऑक्टोबर रोजी पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.