म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याची शिवसेनेची इच्छा आहे, पण त्यांनी युतीची बोलणी शेवटपर्यंत लांबवली, तर आम्हाला नाइलाजाने सर्व जागांवर उमेदवार जाहीर करावे लागतील,’ असा इशारा शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी दिला.
झेडपी व महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, या बद्दल चर्चा सुरू आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसाठी घोसाळकर शिवसेनेचे संपर्कनेते आहेत. निवडणुकीच्या तयारी संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘युतीसाठी शिवसेना उत्सुक आहे. मात्र, यापूर्वीच्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. यापूर्वी शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या छत्तीस जागा लढवल्या. भाजपला चोवीस जागा दिल्या. जागा वाटपाचे प्रमाण हेच रहावे, अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेचे अठरा, तर भाजपचे सात सदस्य निवडून आले होते. यंदा दोन गट वाढले आहेत. दोन्हीही पक्षांसाठी जागा वाटपात पूर्वीचेच प्रमाण कायम ठेवून वाढलेल्या दोन जागांच्या संदर्भात स्वतंत्र विचार करावा अशी आमची भूमिका आहे.
वाढलेल्या दोन गटांमध्ये राजकीय वातावरण कोणत्या पक्षाला अनुकूल आहे याचा विचार करून त्याचे वाटप करावे लागेल. ज्या गट आणि गणामध्ये भाजपची ताकद नाही ते गट आणि गण भाजपला सोडून कसे चालेल ?’ असा प्रश्नही घोसाळकर यांनी उपस्थित केला.
मंगळवारी मेळावा
‘जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद व जालना जिल्ह्याचा शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांचा मेळावा मंगळवारी, १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. अनेक बाबी यावेळी स्पष्ट होतील,’ असे घोसाळकर म्हणाले.
युती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय व्हावा, असे शिवसेनेने ठरविले आहे. त्यानुसार एक बैठक झाली आहे. भाजपने शेवटपर्यंत युतीची बोलणी लांबवली, तर आम्हाला आमची तयारी करावीच लागेल, आम्ही सर्व जागा जाहीर करू.- विनोद घोसाळकर, संपर्कनेते, शिवसेना