म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अशा जीएसटी अर्थात ‘गुडस् अॅँड सर्व्हिस टॅक्स’ अंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड येथील सुमारे २८ हजार ४३१ व्यापाऱ्यांची नोंदणी केली आहे. ३१ जानेवारी ही नोंदणीची शेवटची तारीख असून अजून ७ हजार ४०० व्यापाऱ्यांची नोंदणी व्हायची आहे.
जून २०१७ पासून वस्तू, सेवा कर (जीएसटी) कायदा लागू होणार आहे. या कायद्याच्या पूर्वतयारीसाठी करासंदर्भात असलेले राज्य व केंद्र सरकारचे विभाग सक्रिय झाले आहेत. यामध्ये विक्रीकर विभागाचाही मोठा वाटा आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी या कायद्याअंतर्गत व्यापाऱ्यांच्या नोंदणीत राज्यात औरंगाबाद अव्वल ठरले आहे. जीएसटी अंतर्गत व्यापाऱ्यांच्या नावनोंदणी अभियानाला १४ नोव्हेंबरपासून धडाक्यात सुरुवात झाली. येत्या १९ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ३४ हजार २७७ पैकी २८ हजार ४३१ व्यापाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे औरंगाबादची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
जुन्या नोटांतून ४ कोटी
नोटबंदी झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून विक्रीकर विभागाने युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या सहकार्याने करभरणा करण्यासाठी एक स्वतंत्र काउंटर सुरू केले होते. यात तब्बल चार कोटी २९ लाख रुपयांची विक्रीकर वसुली झाली.
शहरात धाडी सुरू
शहरात विक्रीकर विभागाचे धाड सत्र सुरूच आहे. हॉटेल्स, ज्वेलर्स, रेस्तराँचालक, इतर आस्थापनांनावर धाडी पडल्या आहेत. २०-२५ ठिकाणी शहरात, तर १५-२० ठिकाणी जिल्ह्यात धाडी पडल्या आहेत. आस्थापनांची तपासणी, सर्च, नोंदी घेणे ‘रुटीन वर्क’ आहे. नोटबंदीमुळे धाडसत्र वाढले असे नाही, अशी स्पष्टोक्ती विभागाने दिली.
सुमारे २८ हजार ४३१ व्यापाऱ्यांची जीएसटीअंतर्गत नोंदणी झाली आहे. अजून ७ हजार ४०० जणांची नोंदणी व्हायची आहे. नोटबंदीत जुन्या नोटांतून ४ कोटींची वसुली झाली असून मार्च अखेर अजून १ हजार कोटींची विक्रीकर वसुली करायची आहे. - डी. एम. मुगळीकर, विक्रीकर आयुक्त