औरंगाबाद ः महापालिकेतील खाबूगिरी चव्हाट्यावर आणणाऱ्या बहुचर्चित पेस्ट कंट्रोल प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू, अशी घोषणा गुरुवारी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली.
बनावट स्वाक्षरींच्या आधारे पेस्ट कंट्रोलच्या कामाचे बिल काढण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांच्या फाइलींच्या शोधात पालिकेचे प्रशासन आहे. या प्रकरणी काय कारवाई करणार असे पत्रकारांनी विचारले असता बकोरिया म्हणाले, ‘या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये तांत्रिक शाखेचे उपअभियंता ए. बी. काजी व उपायुक्त अय्युब खान यांचाही समावेश आहे. औषधी फरावणीच्या कामाची २०१२ ते २०१५ पर्यंतची सर्व बिले व व्हाउचर्स तपासण्याचे आदेश या समितीला दिले आहेत. बनावट स्वाक्षरींच्या आधारे बिल उचलण्याचे प्रकार यापूर्वीही घडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षांतील कारभाराची चौकशी सात दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल द्या, असे या समितीला सांगितले आहे. अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करू. तीन वर्षांच्या काळात बनावट स्वाक्षरींच्या आधारे बिल उचलण्याचे प्रकार घडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, तर मागील दहा वर्षांपासूनच्या कारभाराची चौकशी करू,’ असे बकोरिया म्हणाले.