अ‍ॅपशहर

झेडपीच्या सभागृहातून लोकसभेवर नजर

औरंगाबाद जिल्हा परिषद पदाच्या निवडणुकीतही अपेक्षेप्रमाणे शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपच्या तुलनेत आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी झेडपीत काँग्रेसचा हात सोबत घेतला आहे.

Maharashtra Times 22 Mar 2017, 3:00 am
makarand.kulkarni@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra/aurangabad
झेडपीच्या सभागृहातून लोकसभेवर नजर

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषद पदाच्या निवडणुकीतही अपेक्षेप्रमाणे शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपच्या तुलनेत आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी झेडपीत काँग्रेसचा हात सोबत घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत ६२ पैकी सर्वाधिक २३ सदस्य भाजपचे निवडून आले. त्याखालोखाल शिवसेना (१८), काँग्रेस (१६), राष्ट्रवादी काँग्रेस (३) आणि मनसे व रिपाई (डी) प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवेसना व काँग्रेस एकत्र आली आणि त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने देशभर विजयाची मालिका सुरू ठेवली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका निवडणुकीतही भाजप अव्वल ठरला. भविष्यात राजकीय वाटचालीस अडथळा ठरू नये, यासाठी पंचायत समिती सभापती निवडणुकीपासून काँग्रेस आणि शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. राज्यात, केंद्रात शिवसेना - भाजपची युती आहे. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना - भाजप एकत्र येतील, असा अंदाज होता. पण आगामी वाटचाल डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेऊन सर्वांनाच धक्का दिला. फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसची बाजू वरचढ आहे. तिथे भाजपची ताकद मोठी आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्य मतदारसंघातील या तालुक्यांमध्ये शिवसेनेची ताकद तुलनेत कमी आहे. त्यामुळे पंचायत समिती, झेडपीत काँग्रेससोबत जाऊन राजकीय सेनेला तोटा होण्याऐवजी भाजपला रोखण्यात यश मिळेल या शक्यतेने ही नवीन युती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी लोकसभेसाठी पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूरमध्ये मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने सेनेकडून पावले उचलली जाऊ शकतात. एकूणच भविष्यातील वाटचाल गृहित धरूनच जिल्हा परिषदेत काँग्रेस - शिवसेना युती झाल्याचे चित्र आहे. यामध्ये भाजप काहीशी बॅकफूटवर गेली आहे. केंद्र, राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, विधानसभा अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष असूनही झेडपीत सत्ता मिळविण्यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न पक्षाकडून झाले नसल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. सेना - काँग्रेस युतीसाठी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष गैरहजर
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना - काँग्रेसने यश मिळविले. प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषदेत काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पण प्रभारी जिल्हाप्रमुख नामदेव पवार मात्र कुठेच दिसले नाहीत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता मोबाइल स्वीच ऑफ होता.

भाजपने सत्ता व संपत्तीचा पुरेपूर वापर केला. सर्वसामान्य जनता व शिवसैनिकांच्या मनात याबाबत प्रचंड चीड होती. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत युती केली.
- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

काँग्रेसने शिवसेनेसोबत जावे अशी आमच्या पक्ष कार्यकर्त्यांची व मतदारांची मनातील इच्छा होती. भविष्यात याचा आम्हाला फायदाच होणार आहे. भाजपला रोखण्यात आम्हाला यश मिळाले.
- डॉ. कल्याण काळे, माजी आमदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज