म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गुरुकुल पद्धतीतील शिक्षण सध्या दिले जात नाही, पण तीच पद्धत योग्य आणि आयुष्याच्या वाटेवर फलदायी आहे,’ असे मत ज्येष्ठ मॅनेजमेंटगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक डॉ. गणेश नटराजन यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या ४३ व्या रेअरशेअर कार्यक्रमात बोलत होते.
देवगिरी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक ऋषी बागला होते. यावेळी सतीश कागलीवाल, एएमएचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी उपस्थित होते. नटराजन म्हणाले, ‘मी बिहारसारख्या राज्यात एका शहरातून आलो. माझे मेकॅनिकल इंजिनिरिंग झाले. त्या नंतर मॅनेजमेंट आणि इतर शिक्षण घेत गेलो. आमचे कुटुंब तसे मध्यमवर्गीय. घरात कमावणारे वडील एकटे व खाणारे तोंड सहा. यामुळे सातत्याने सर्वसामान्य कुटुंबाचे जीवन अनुभवायला आले. वडील रामकृष्ण मिशनमध्ये जात होते, पण मी स्वतः इंग्लिश मीडियममधून शिक्षण घेतले. इंग्लिश सुधारली. शाळा कॉलेजपेक्षा कुतूहलातून मिळवलेले ज्ञान कायम कामी आले, म्हणून गुरुकुल शिक्षण कसे चांगले हे मला पटले. यानंतर मेकॅकिल इंजिनिअरिंग केले. इंडस्ट्रिअल मॅनेजमेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवून पदव्यूत्तर शिक्षण घेतले. यानंतर आयआयटी मुंबईमध्ये मॅनेजमेंट पीएचडी घेतली आणि अमेरिकेत जाऊन हॉवर्ड बिझनेस स्कूल येथे अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम हा कोर्स पूर्ण केला. यानंतर मी क्रॉम्पटन ग्रीव्हज येथे नोकरी केली. येथील अनुभवाच्या जोरावर स्वत:चे सीहॉर्स सिस्टीम सुरू केले. यांतर एनआयआयटी, अॅपेटेकमध्ये पार्टनर झालो. झेन्सर टेक्नॉलॉजीचा सीईओ व नंतर उपाध्यक्ष असे पद भूषवले. सीआयआय, नॅस्कॉम यांची विविध पदे भूषवली. नॅस्कॉम फाऊंडेशनचे सध्या लिडिंग करताना खूप समाजसेवाही करता येत आहे. या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत अनेकांना प्रेरणा देत गेलो. प्रेरणा घेत गेलो. हेच यशाचे गमक ठरले,’ असे ते म्हणाले.
ऋषी बागला यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, ‘ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि आता संन्यास या चारही पातळीवर नटराजन यशस्वी झाले असून, आता ते युवकांना शिक्षण क्षेत्रात काम करून प्रेरणा देत आहेत.’
नटराजन यांचे बोल
‘स्वत:ला जातीपातींमध्ये विखुरण्यापेक्षा आपण इंडियन आहोत हे जगासमोर ठेवा. सध्याचे मोदी सरकार शिक्षण व्यवसाय, उद्योग, डिजिटल इंडियासाठी खूप सकारात्मक आहे. ते युवकांनी स्वीकारले पाहिजे. चीन भारत यामधील ‘टॅलेंट’ जगाने मान्य केले आहे. संशोधन आणि शिक्षण यावर भर द्या. खूप पुढे जाता येईल आणि यामुळेच भारत सक्षम आणि डिजिटल होण्यास मदत होईल. आम्ही आमच्या कंपनीद्वारे भारत सरकारच्या सहकार्याने यात क्षेत्रात खूप काम करत आहोत.’