म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोना विषाणू संसर्गाशी दोन हात करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे 'लॉकडाऊन'नंतर करोनाग्रस्तांचा आणखी मोठ्या प्रमाणावर उद्रेक वाढल्यास अशा रुग्णांना २४ तास अपेक्षित उत्तम सेवा देण्यासाठी घाटीसह जिल्हा रुग्णालयाला तब्बल साडेतीनशे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची गरज पडणार आहे. यामध्ये एकट्या घाटीसाठी आणखी सुमारे अडीचशे डॉक्टर-कर्मचाऱ्यांची गरज आहे, तर जिल्हा रुग्णालयाला ६० डॉक्टर-परिचारिकांची गरज आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, फार कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावरील तज्ज्ञांसह कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) 'कोव्हिड वॉर्डा'मध्ये करोनाग्रस्तांना सेवा दिल्या जात आहेत आणि सध्या ही रुग्णसंख्या पन्नासच्या घरात असली तरी भविष्यात ही रुग्णसंख्या नक्कीच वाढू शकते, मात्र सध्याच्या मेडिसिन बिल्डिंगमध्ये सुरू केलेल्या 'कोव्हिड वॉर्डा'त २०८ पेक्षा जास्त करोनाग्रस्तांना दाखल करणे शक्य नाही. त्यानंतरही रुग्णसंख्या वाढली तर मात्र सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करोनाग्रस्तांना दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी एकंदर स्थिती आहे. त्याचवेळी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले तरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व मेडिसिन बिल्डिंगमधील करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यामध्ये पाच इन्टेसिव्हिस्ट, दहा फिजिशियन, ३० एमबीबीएस डॉक्टर, ३० आयुष डॉक्टरसह एकूण ७० डॉक्टर, १०० परिचारिका, दहा तंत्रज्ञ, १०० सेवक, अशा सुमारे २८५ मनुष्यबळाची गरज पडणार आहे. अर्थात, इन्टेसिव्हिस्ट व फिजिशियनशिवाय बीएचएमएस (मॉडर्न फार्माकॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेले होमियोपॅथी डॉक्टर); तसेच बीएएमएस डॉक्टरही उपयुक्त ठरू शकतात, अशी स्थिती आहे. त्याचवेळी निवृत्त परिचारिकांचाही मर्यादित कालावधीसाठी विचार होऊ शकतो, असेही घाटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनुष्यबळास दिला जाणार १४ दिवसांचा गॅप
राज्यातील पहिलेच स्वतंत्र 'कोव्हिड १९ हॉस्पिटल' अशी ओळख झालेल्या शहरातील चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे पूर्णपणे करोनाग्रस्तांसाठी असून, या ठिकाणी सध्या केवळ करोनाग्रस्तांवरच उपचार होत आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयामध्ये 'आयसीएमआर'च्या मार्गदर्शक तत्वांनुसार योग्य अंतर राखून जास्तीत जास्त १३० करोनाग्रस्तांवर उपचार होऊ शकतात. २०० खाटांच्या दृष्टिकोनातून रुग्णालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २० पदे रिक्त होती. तीदेखील नुकतीच भरण्यात आली आहे व त्यांचे वेतन हे 'कोव्हिड फंडा'तून दिले जाणार आहे, मात्र करोनाग्रस्तांवर सलग १४ दिवस उपचार केल्यानंतर संबंधित डॉक्टर, परिचारिकेस १४ दिवसांच खंड देणे अपेक्षित आहे व याच पद्धतीने राज्यात इतरत्र डॉक्टर-परिचारिकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांच्या रुग्णसेवेचा विचार करून २० वैद्यकीय अधिकारी व ४० परिचारिकांची कंत्राटी तत्वावर लवकरच नियुक्ती होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २८५ डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱयांची तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. या मनुष्यबळाशिवाय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करता येणे कठीण आहे.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी
करोनाग्रस्तांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त ६० डॉक्टर-परिचारिकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती लवकरच होणार आहे. अपेक्षित मनुष्यबळाची निवड जवळजवळ झाली असून, येत्या काही दिवसांत ही नियुक्ती होईल.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्स, जिल्हा रुग्णालय