म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहितेच्या गर्भाशयात अनियंत्रित वाढणारा गर्भ त्वरीत काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी दिले. घाटीच्या वैद्यकीय बोर्डाने गर्भपात करण्याचा अहवाल दिला होता.
जालना येथील रहिवाशी असलेली संगीता बंडू हिवाळे हिने आपल्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाची तपासणी जालना येथील ओट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रेडिओलॉजी विभागात केली. येथील डॉ. पियूष श्रॉफ यांनी गर्भात वाढणाऱ्या बाळाचा मेंदू कवटीबाहेर येत असल्याचे निरीक्षण नोंदवून दोन्ही मूत्रपिंडावर रक्त साचल्याचेही सांगितले. गर्भात वाढणाऱ्या बाळास मोठ्या प्रमाणावर शारीरिक व्यंग असून, गर्भपात करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले. यासाठी विवाहितेने शासकीय रुग्णालयात (घाटी) तपासणी केली असता डॉ. व्ही. कल्याणकर यांनीही गर्भपाताचा सल्ला दिला. विवाहितेने औरंगाबाद खंडपीठात ११ मे रोजी धाव घेतली. जी. बी. कुलकर्णी यांनी संबंधित महिलेच्या वतीने याचिका दाखल केली. या महिलेची तपासणी वैद्यकीय बोर्डामार्फत करण्याची विनंती खंडपीठाकडे केली.
याचिकाकर्त्यातर्फे जी. बी. कुलकर्णी, राज्यशासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अभिजीत नामदे तर केंद्रातर्फे ए. एस. नागोडे यांनी काम पाहिले.
\Bडॉक्टरांच्या अहवालावरून निर्णय\B
घाटीतील पाच डॉक्टरांच्या समितीने महिलेची १४ मे रोजी तपासणी केली. या अहवालात गर्भपात केला जाऊ शकतो, असे नमूद केले. गर्भ २२ आठवडे सहा दिवसांचा असल्याने लवकरात लवकर गर्भपात करणे योग्य ठरेल जेणेकरून मातेच्या जीवितास धोका कमी राहील. हा अहवाल खंडपीठासमोर ठेवण्यात आला. उपरोक्त अहवालावरून त्वरीत गर्भपात करण्याचे आदेश दिले.