म. टा. प्रतिनिधी, कन्नड
'अपघात झालेल्या वाहनाला नुकसान भरपाई मिळते, मग निसर्गाच्या अपघातात पिकांना संरक्षण का नाही? पंतप्रधान पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यासाठी हप्ता जमा करून शासनाला लुटण्यासाठी आहे का,' असा सवाल किसान महासभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांनी केला.
तालुक्यातील हतनूर येथे किसान महासभेतर्फे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. किसान महासभेतर्फे तालुक्यात शेतकऱ्यांसोबत संवादासाठी शाखा स्थापन करण्यात येत आहे. यावेळी हतनूरचे माजी सरपंच एस. बी. अकोलकर हे अध्यक्षस्थानी होते.
कॉ. क्षीरसागर म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी किमान समान कार्यक्रमाची आवश्यकता असून पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकरी एक रुपया भरतो, तर राज्य शासन चार रुपये, केंद्र शासन चार रुपये, असे एकूण नऊ रुपये जमा होतात. अवकाळी पावसाने सोयाबीन, मका, कापूस या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. एकाही ठिकाणी विमा प्रतिनिधी फिरकला नाही. या घटनांची दखल घेतली जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आता केंद्र सरकारकडून बाजार समिती बरखास्तीचा प्रयत्न म्हणजे चोरांना मोकाट सोडल्यासारखेच आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान महासभेचे जिल्हा सचिव कैलास कांबळे यांनी केले. कॉ. डॉ. राम बाहेती यांनीही विचार मांडले. यावेळी किसान सभेचे ज्ञानेश्वर गवळी, भाऊसाहेब पवार, तालुकाध्यक्ष दौलत मोहिते, मच्छिंद्र अकोलकर, बाळू भोसले, प्रहार संघटनेचे विनायक केरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र काळे यांनी केले, तर लक्ष्मण केरे यांनी आभार मानले.