म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी, बारावी आणि पदवीला कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात मात्र सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेला आहेत. औरंगाबाद विभागात जवळपास ४५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी हे कला शाखेचे आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या बीए, बीएस्सी, बीकॉमसह एम. ए., एम. कॉम., एमएस्ससी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. औरंगाबाद विभागातून ६८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून, ७२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विभागातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांमधून सर्वाधिक परीक्षार्थींची संख्या बीड जिल्ह्यातील आहे. मुक्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेतील विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, हे परीक्षार्थींच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ७२ हजार परीक्षार्थींपैकी ४५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हे कला शाखेशी निगडीत आहेत. यंदा उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या स्तरावरूनच होत आहे. मागील वर्षीपर्यंत हे काम खासगी कुरिअरमार्फत केले जायचे. यंदापासून विभागीय पातळीवर जिल्हास्तरावर एक समन्वयक नेमण्यात आला असून उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया केली जाते. या उत्तरपत्रिका चार टप्प्यात जमा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर एकत्रित त्याची तपासणीची प्रक्रिया होणार आहे.
\Bकॉपी थांबेना
\Bमुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतही कॉपीला आळा घालणे शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागातील केंद्रात कॉपी करू देण्यास आग्रह केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉपी प्रकरणांना आळा बसावा यासाठी विद्यापीठाने बैठे पथकांसह भरारी पथकांचीही नेमणूक केली आहे. बैठे पथक केंद्रावर परीक्षा होईपर्यंत असते तर, भरारी पथकांना विविध केंद्रांना भेटी देत नियमितपणे अहवाल द्यायचा आहे.
विविध अभ्यासक्रमांमध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परीक्षा सुरळीत सुरू असून गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे अन् भरारी असे दोन्ही पथक कार्यरत आहेत.
- डॉ. राम माने, विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, औरंगाबाद
\Bपरीक्षा सुरू
\B- ६० परीक्षा केंद्र
- ७२००० विद्यार्थी
- ६ केंद्र औरंगाबादमध्ये
- २२ जिल्ह्यात
- १९००० विद्यार्थी संख्या