म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेसाठी राज्यातून डीटीएड, बीएडधारकांचा कल यंदा वाढला आहे. दोन्ही पेपरला तीन लाख ४३ हजार २६४ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया झाल्याने अर्जांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे.
परीक्षा परिषदेतर्फे 'महाटीईटी' १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आठ ते २८ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आली. प्राथमिक (पेपर-१), माध्यमिक (पेपर-२) अशा दोन स्तरावर डीटीएड, बीएडधारकांकडून अर्ज मागविले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या वाढली असून मुदतवाढीच्या मागणीला नकार देण्यात आला. ऑनलाइन अर्ज भरलेल्या तीन लाख ४३ हजार २६४ पैकी सर्वाधिक अर्ज प्राथमिकस्तरासाठी (पेपर-१) आलेले आहे. पेपर-१ साठी एक लाख ८८ हजार ६७८, तर पेपर-२साठी एक लाख ५४ हजार ५८६ अर्ज आले आहेत.
\Bउमेदवारांचा वाढता कल\B
राज्यात शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१३ पासून 'टीईटी' बंधनकारक करण्यात आली आहे. एका वर्षात दोन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु तसे झाले नाही. शिवाय २०१०पासून शिक्षक भरती रखडल्याने परीक्षेकडे कल कमी राहिला. तीन वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला अडचणीत सापडलेली ही प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी मार्गी लागली. पहिल्या टप्प्यात ५८२२ उमेदवारांची निवड यादी झाली. मागील महिन्यात 'टीईटी' परीक्षेचे वेळापत्रक आले. नऊ वर्षानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने 'टीईटी'कडे कल वाढल्याचे दिसते. गेल्या वर्षी पावणे तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. शुल्काच्या रुपाने परिषदेच्या तिजोरीची भरभराट झाली आहे.
\Bएकूण अर्ज..३४३२६४\B
\Bपेपर-१साठी अर्ज १८८६७८
पेपर-२साठी अर्ज १५४५८६
पेपर-१साठी पेपर-२पेक्षा अधिकचे अर्ज ..३४९०२\B