म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपेगाव-हिरडपुरी बंधारा आणि डाव्या-उजव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी २१ मे रोजी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा तोडणार आहेत. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी रविवारी झालेल्या बैठकीत निर्णय जाहीर करण्यात आला. पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी दोन आठवड्यांपासून गाजत आहे.
आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण, गेवराई आणि शेवगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने वारंवार पाठपुरावा करूनही पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी रविवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, हनुमान बेलगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, बाबा वाघमोडे, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनगर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी १३ ते १६ मे या चार दिवसांत विविध पातळीवर आंदोलन केले पण, राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही येत्या २३ मे रोजी मतमोजणी असून, नंतर काही दिवस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांकडे पहायला वेळ राहणार नाही. या दिरंगाईत शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी होईल. म्हणून २३ मे पूर्वी पाणी सोडावे, अन्यथा औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचा येईल असा निर्णय घेतला असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.
\Bसरकारी अनास्था\B
पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांनी म्हटले आहे पण, विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जलसंपदा विभागात ठिय्या आंदोलन झाले. तरीसुद्धा प्रशासन पाणी सोडण्याचा निर्णय घेत नसल्याने शेतकरी संतापले आहेत.