म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने महापालिकेत सत्ता दिली, पण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयश आले. या त्रासाबद्दल शहरवासीयांची जाहीर माफी मागतो. येत्या दहा दिवसांत कचऱ्याची समस्या दूर करण्यात येईल,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत औरंगाबादकरांची माफी मागितली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कचरा इतरत्र टाकता येत नसल्यामुळे शहरात कचरा साचला आहे. कचराकोंडी सुटली नसल्याने जनता त्रास सहन करीत आहे. जनतेला त्रास झाल्याबद्दल मी माफी मागतो. कचऱ्याचा प्रश्न का निर्माण झाला आणि प्रश्न सोडविण्यासाठी उशीर का झाला, असे विचारून राजकारण करायचे नाही, मात्र शहरात कचरा प्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. कचरा प्रश्न सोडविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचीही ऐनवेळी बदली झाली,' असे सांगत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल उपस्थित होते.
आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना कचऱ्याचा प्रश्न कधीपर्यंत सोडवणार, असा सवाल केला. कचऱ्याची समस्या का निर्माण झाली आणि आतापर्यंतच्या प्रयत्नांची माहिती घोडेले यांनी दिली; तसेच येत्या दहा दिवसांत शहरात कचरा दिसणार नाही, असे सांगितले. 'या शहरावर माझे प्रेम आहे. शहरातील नागरिकांची गैरसोय होणे वाईट आहे. प्रयत्न करा आणि लवकर कचरा निर्मूलन करा,' असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. कचरा हटवण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंदूर येथील कंपनीशी करार करून काही यंत्रे खरेदी करण्याची गरज असल्याची माहिती ठाकरे यांना अधिकाऱ्यांनी दिली. इंदूर दौरा करून यंत्र खरेदी करा, पण कचरा लवकर दूर करा, असे उद्धव यांनी सुचविले. येत्या २२ एप्रिल रोजी महापालिकेचे पदाधिकारी इंदूरला जाणार आहेत. कचरा प्रश्नामुळे शिवसेनेची राज्यभर नाचक्की झाल्याची चर्चा आढावा बैठकीत झाली.
दरम्यान, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कचरा प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. 'मी जिल्ह्याचा पालकमंत्री नाही. कचरा प्रश्नावर उपाय सुचवल्यास इथेसुद्धा नाक खुपसतो अशी तक्रार काही लोक करतील,' असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.
\Bदहा दिवसांची चिंता\B
शहरातील कचरा दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महापौरांना दहा दिवसांची मुदत दिली. दहा दिवसानंतर पुन्हा पाहणीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. रस्त्यावर तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही असे आश्वासन घोडेले यांनी दिले. दहा दिवसानंतर पुन्हा कचरा दिसल्यास पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, असे ठाकरे यांनी सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. दहा दिवसांच्या 'डेडलाइन'मुळे महापौर व पदाधिकारी चिंताक्रांत आहेत.
\Bमटा भूमिका
उशिरा सुचलेले शहाणपण
\Bमहापालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला अखेर कचराप्रश्नी जनतेची माफी मागावी लागली. हे कचराप्रश्न न सोडविण्याचे पाप स्थानिक शिवसेना नेत्यांचेच होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागून एक प्रकारे औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. खरे तर ही माफी यापूर्वीच शहराचे आणि पक्षात बढती मिळालेले खासदार चंद्रकांत खैरे यांनीची मागायला हवी होती. काहीही असो, अखेर शिवसेनेला उशिरा शहाणपण सुचले, हेही नसे थोडके. औरंगाबाद खंडपीठात कचराप्रश्नावर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलेही होते. त्याकडेही दुर्लक्ष झाले. ६२व्या दिवशी औरंगाबाद शहरातील कचराप्रश्न सुटलेला नाही. खंडपीठात औरंगाबाद महापालिकेला तब्बल १९ प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागली, तरीही खंडपीठाचे समाधान झालेले नाही. या शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडेही आता उद्धव ठाकरे यांना लक्ष द्यावे लागले. 'समांतर'चे पाणी, भूमिगत गटार योजना या योजनांकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे यांनी दर तीन महिन्यांतून एकदा औरंगाबाद पालिकेने केलेल्या विकास कामांचा आढावा घेऊ, असे सांगितले होते, पण हा आढावा गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत केवळ एकदाच घेण्यात आला. पक्षप्रमुखांनी माफी मागणे, ही नामुष्कीच म्हणावी लागेल, आता शिवसेनेला ३० एप्रिलपर्यंत कचराप्रश्न सोडवावाच लागणार आहे. या माफीची जाण पदाधिकाऱ्यांनी ठेवावी.