म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने बुधवारी (२६ सप्टेंबर) सकाळी घाटी हॉस्पिटलमधून क्रांतीचौकापर्यंत काढण्यात आलेल्या 'महारॅली'तून अवयवदानाचे जनजागरण करण्यात आले. यात एक हजारापेक्षा जास्त वैद्यकीय, दंत, परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.
'महारॅली'ला महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, झेडटीसीसी अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मुख्य संयोजक व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, संयोजक डॉ. अरविंद गायकवाड आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मान्यवरांनी सहभागी झालेल्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत अवयवदानाचे महत्त्व विषद केले तसेच अवयवदानाचे आवाहनही केले. ही 'महारॅली' घाटी हॉस्पिटलपासून निघून ज्युबली पार्क, मिल कॉर्नर, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट मार्गे क्रांतीचौकात आली. येथे 'महारॅली'चा समारोप झाला. समारोपावेळी डॉ. येळीकर यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती देत तब्बल आठ व्यक्तींचे आयुष्य पालटून टाकणाऱ्या अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. काशिनाथ गर्कळ, डॉ. प्रतिमा तुंगीकर, डॉ. दीपक कावळे, डॉ. स्वप्ना अंबेकर, डॉ. दिनेश पाटील, निलेश कोतकर, यशवंत कांबळे, कैलास तेलबोटे आदींनी पुढाकार घेतला.