अ‍ॅपशहर

'स्मार्ट सिटी'साठी केंद्रीय पथकाची लाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथकच लाचेच्या जाळ्यात अडकले आहे . औरंगाबाद शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी पालिकेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी लाच मागणा-या शैलेश बजानियाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मध्यरात्री अटक केली.

Maharashtra Times 23 Jan 2017, 1:00 am
मटा ऑनलाइन वृत्त ।औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bribe for smart city
'स्मार्ट सिटी'साठी केंद्रीय पथकाची लाच


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथकच लाचेच्या जाळ्यात अडकले आहे . औरंगाबाद शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी पालिकेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी लाच मागणा-या शैलेश बजानियाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मध्यरात्री अटक केली.

महापालिकेच्या बाजूने सकारात्मक अहवाल देण्यासाठी या पथकाने चक्क महापालिकेच्या अधिका-यांकडूनच एक लाख सत्तर हजार रुपये लाच घेतली. मात्र महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या निर्णयामुळेच पथकातील बजानियाला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लाच घेताना पकडले गेले. विशेष म्हणजे पकडण्यात आलेला लाचखोर हा गुजरात राज्यातील आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेल्या पथकातील शैलेश बजानिया , विजय जोशी आणि गोविंद घिमरे (सर्व राहणार सूरत, गुजरात) यांनी शहरात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली. शनिवारी मध्यरात्री सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली
यंदा ‘स्मार्ट सिटी’च्या ‘टॉप टेन’ मध्ये औरंगाबाद शहर यावे म्हणून महापालिकेने तीन महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी १९ जानेवारीला तीन सदस्यांचे पथक औरंगाबाद शहरात दाखल झाले.


पथकातील ज्येष्ठ सदस्य शैलेश बजोरिया यांनी महापालिकेत बसून ९०० गुणांसाठी कागदपत्रांची पाहणी सुरू केली. त्यांच्या सोबतचे दोन सदस्य विजय जोशी, गोविंद घिमारे यांनी शहरात वेगवेगळ्या भागांत पाहणी केली . शनिवारी सायंकाळी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आल्यावर सर्व सदस्यांनी आम्हाला दारू पाहिजे अशी मागणी केली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक जयश्री कुलकर्णी, घनकचरा विभागाचे सहायक अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी ही बाब उपायुक्त अय्युब खान यांच्या कानावर घातली. खान यांनी त्वरित बकोरिया यांना सांगितले. औरंगाबाद शहराचे अत्यंत वाईट चित्र उभे करून आम्ही जशास तसा अहवाल क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाला सादर केला तर तुमचे बाद होईल असे या पथकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तुम्हाला ,तुमचे शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत टिकवायचे असेल तर थोडा खर्च येईल ,तुमचे शहर पहिल्या २० मध्ये येईल . त्यासाठी अडीच लाख द्यावे लागतील अशी थेट लाच मागितली. ही बाब समजताच पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आदेश डॉ . जयश्री कुलकर्णी यांना दिले. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोड अंती १लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शैलेश बजानियाला लाच घेताना अटक केली . आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज