\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B
'देश उभारणीत 'सीएं'चे मोठे योगदान आहे. हा एकमेव असा अभ्यासक्रम आहे ज्यात तासिकेला दांडी मारणे नावाचा प्रकारच चालत नाही. आर्थिक गुन्हे शोधताना आम्हा पोलिसांना अनेकवेळा तुम्हा लोकांची मदत होते,' असे कौतुकोद्गार पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शनिवारी काढले. ते औरंगाबाद चार्टर्ड अकाऊंटंट शाखेतर्फे आयोजित परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
सातारा परिसरातील शाखेच्या सभागृहात दोन दिवसीय परिषदेला सुरुवात झाली. परिषदेची यंदा 'जोखमेवर प्रेम करा' विषयावर आधारित थीम आहे. यावेळी व्यासपीठावर शाखेचे अध्यक्ष रोहन आचलिया, प्रमोद जैन, गणेश शीलवंत, प्रवीण बांगड, रूपाली बोथरा, योगेश अग्रवाल, पंकज सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, 'सीएची परीक्षा देशातील सर्वात अवघड म्हणून ओळखली जाते. इतर कोणतीही पदवी किंवा परीक्षा देताना तासिका चुकविण्याची मुभा असते. ती पदवी कशीबशी मिळतेच, पण सीए करताना अशाप्रकारची दांडी मारणे चालतच नाही. देशातील आर्थिक गुन्हे शोधताना आम्हाला तुमची बऱ्याच वेळा मदत होते. त्यामुळे देश उभारणीत तुमचा मोठा वाटा आहे.' यावेळी प्रमोद जैन, उमेश शर्मा, शाखेचे अध्यक्ष आचलिया यांची भाषणे झाली. ही परिषद दोन दिवस चालणार असून देशभरातून दिग्गज या ठिकाणी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.