अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी ?

बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार आहे, अशी जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपमधील इच्छुकांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra Times 11 Nov 2018, 8:13 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vidhanbhavan


बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार आहे, अशी जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपमधील इच्छुकांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, भाजपच्या प्रदेशाध्यक्षासह ज्येष्ठांनीही यापूर्वी दोन ते तीन विस्तार होणारच असे सांगत इच्छुकांना हुलकावणी दिली होती. त्यामुळ‌े यंदा पुन्हा तेच होणार की खरेच मुहूर्त लागणार, हे काळच ठरवेल.

गेल्या अनेक महिन्यापासून होणार - होणार अशी चर्चा असलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. मागे संधी मिळाली नाही. यंदा तरी मिळेल, अशी आशा धरत अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात विस्ताराची शक्यता होती, पण आता येत्या वीस दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'मटा'शी बोलताना व्यक्त केली. मंत्रिमंडळात सध्या शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असून आगामी निवडणुका, प्रादेशिक समतोल यासर्वांचा विचार करूनच कोणाची वर्णी लागणार, यावर पक्षश्रेष्ठी विचार करतील, असेही त्यांनी नमूद केले.

मराठवाड्यातील कोणाची वर्णी ?

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मराठवाड्यातीलच पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर तसेच संभाजी पाटील निलंगेकर या तिघांकडे कॅबिनेट मंत्रिपद असून प्रगतीपुस्तक चांगले असल्याने यात कोणताही बदल होण्याची चिन्ह नाही. यांच्यासह मराठवाड्यातील आणखी एका आमदाराची वर्णी मंत्रिमंडळात लागेल. यात प्रामुख्याने औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल सावे यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची खास पसंती असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासह उस्मानबादचे विधानपरिषद सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे यांची नावे चर्चेत होत आहे. मात्र, शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला यंदा संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा असून शेवटी श्रेष्ठी कोणच्या पारड्यात वजन टाकतात, हेच महत्वाचे ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज