म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढत आहे. व्यवस्थापन परिषदेने 'कॅरिऑन' देऊ नये, असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे पेचात अडकलेल्या प्रशासनाने शुक्रवारी कॅरिऑनचे परिपत्रक काढले नाही. निकष आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन योग्य पर्याय काढण्याचा प्रयत्न आहे असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅरिऑनसाठी आंदोलन सुरू आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तांत्रिक अडचण सांगून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे गरजेचे आहे, असे निदर्शनास आणून दिले. 'चॉइस बेस्ड सिस्टिम' लागू होणार असल्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थ्यांची अडचण होईल. या परिस्थितीत पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी पर्याय काढण्याची मागणी आहे. प्राथमिक पातळीवर विद्यापीठाने मागणी मान्य केली. निकष आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रारूप ठरवले जाणार आहे. याबाबत शुक्रवारी निर्णय होऊ शकला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच निर्णय होईल असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देणार आहे, असे लक्षात आल्यानंतर विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही कुलगुरूंची भेट घेऊन कॅरिऑनची मागणी केली. संस्थाचालक आणि प्राचार्य कॅरिऑनची आग्रही मागणी करीत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याने संस्थांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचा ठराव असूनही प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मागील वर्षी घेतलेल्या कॅरिऑनच्या निर्णयाची चौकशी राजभवन कार्यालयाने केली आहे. गुणवत्ता राखण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राजभवनची मान्यता घेणे अनिवार्य आहे. हा निर्णय परस्पर घेतल्यास राजभवनकडे तक्रार करण्यात येईल, असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.