म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना 'लॉकडाऊन'च्या काळात मुख्यालयी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, मात्र तरीही अनेक अधिकारी 'रेड झोन'मध्ये असलेल्या औरंगाबाद येथून दररोज वैजापूरला ये-जा करत आहेत. अशा सहा अधिकाऱ्यांना पथकाने बुधवारी गंगापूर चौफुलीवर पकडले. त्यांच्याविरुद्ध कलम १८८नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी फिर्याद तलाठी जितेंद्र चापानेरकर यांनी दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
जनार्धन सोळसे (३४, रा. गंगापूर), रवीराज लाड (२४, रा. गंगापूर), गजानन जाधव, शेख फिरोज शेख दादा (३४), इमान उबाळे (३२), स्वप्निल बोरसे (४०), अजित पाठक (३८, सर्व रा. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत. ते स्टेट बँक ऑफ इंडिया, महावितरण, भारतीय आयुर्विमा महामंडळ व खासगी संस्था अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप, तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागिय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चरभरे, हेड कॉन्स्टेबल जाधव, अभंग यांच्या पथकाने सकाळी दहाच्या सुमारास गंगापूर चौफुलीवर पाळत ठेऊन औरंगाबादहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली. त्यावेळी काही नागरिक औरंगाबाद येथून व काही गंगापूर येथून 'अप-डाऊन' करत असल्याचे आढळून आले. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिसात रितसर फिर्याद देण्यात आली. त्यावरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.