- दोन महिन्यांत निम्म्या गंभीर केसेसमध्ये महिला उशिरा दाखल
- ग्रामीण भागातून प्रथमोपचाराशिवाय पाठविले घाटी हॉस्पिटलमध्ये
- गेल्या महिन्यातील १०६६पैकी ५५० महिला 'रेफर' केलेल्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागामध्ये गेल्या दोन महिन्यांत ३० ते ४० टक्के गर्भवती या गंभीर, अत्यवस्थ व गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील निम्म्या केसेसमध्ये महिला रुग्ण हे उशिरा व प्रथमोपचारांशिवाय दाखल झाल्याचेही दिसून आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण मोठे आहे, असेही समोर येत आहे.
मागच्या महिन्यात घाटीच्या स्त्रीरोग विभागात एक हजार ६६ प्रसूती झाल्या. यापैकी सुमारे ५५० केसेस या 'रेफर' केलेल्या होत्या. म्हणजेच एकतर दुसरीकडून रुग्णांना घाटीत पाठवण्यात आले होते किंवा दुसरीकडे उपचार मिळाले नाहीत म्हणून रुग्ण घाटीत आले होते. यातील २० टक्के केसेसमध्ये गर्भवतींना वेगवेगळ्या कारणांमुळे घाटीत दाखल होण्यास उशीर झाला होता व त्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर, भोकरदन, हातनूर आदी ग्रामीण भागांतून पाठवण्यात आलेल्या गर्भवतींवर प्राथमिक उपचार करण्यात आले नसल्याचेही दिसून आले आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या केसेसमध्येही गंभीर गुंतागुंत दिसून आली आहे. या संदर्भात घाटीचे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, 'अलीकडे घाटीत दाखल होणाऱ्या गर्भवतींमध्ये गंभीर गुंतागुंत होण्याचे प्रमाण निश्चितच वाढले आहे. अनेक रुग्णांवर प्राथमिक उपचारही केलेले नसतात आणि असे रुग्ण घाटीत दाखल होईपर्यंत त्यांची स्थिती आणखी गंभीर झालेली असते. परिणामी, बाळावर व मातेच्या प्रकृतीवर निरनिराळे गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.'
उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यू
घाटीमध्ये दाखल केलेल्यांपैकी सात मातांचा मृत्यू झाला. सात माता मृत्युच्या केसेसमध्ये संबंधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले असते तर, त्या वाचल्या असत्या, अशी एकंदर स्थिती जाणवली, असेही निरीक्षण डॉ. गडप्पा यांनी नोंदवले.
'त्या' गर्भवतीलाही पाठवले खासगीतून
भवानीनगर येथील ३० वर्षांची गर्भवतीला सोमवारी (नऊ जून) गंभीर स्थितीत घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते आणि संबंधित महिला रुग्णावरही खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र रुग्ण मुळातच त्या खासगी रुग्णालयात उशिरा गेल्यामुळे व खासगी रुग्णालयानेही रुग्णाला पुन्हा घाटीत पाठवल्याने रुग्ण घाटीत दाखल होईपर्यंत स्थिती अतिगंभीर झाली होती. रुग्णाच्या गर्भपिशवीत वार सुटून रक्ताचा गोळा तयार झाला होता व तपासणीत पोटातील बाळ दगावल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचवेळी रुग्णाला अतिरक्तस्त्राव सुरू होता. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पोटातले मृत बाळ व ७५० ग्रामची रक्तगाठ काढण्यात आली आणि रुग्णाला तातडीने १६ बॅग रक्त व रक्तघटक देण्यात आले. दरम्यान, रुग्ण बाधित भागातून आल्यामुळे रुग्णाचा स्वॅब घेण्यात आला होता व स्वॅब रिपोर्टमध्ये रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रुग्णाच्या स्थितीमुळे रुग्णास अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.