म. टा. प्रतिनिधी फुलंब्री
पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील तरूण, महिला व ग्रामस्थांनी गावातील दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी गावातील दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात वडोदबाजार पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले आहे.
पीरबावडा येथे होत असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित होऊन, कौटुंबिक कलह, बस स्थानकांवर मद्यपींचा प्रवाशांना, दुकानदारांना होणार त्रास थांबेल. गेल्या महिन्याभरात गावातील अनेकांचा दारू प्यायल्यामुळे अपघात झाला. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले.
१५ ऑगस्ट २०१६ रोजी पीरबावडा ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेत व वडोदबाजार पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देऊन दारूबंदी करावी, अशी विनंती केली, परंतु अद्याप पीरबावडा गावात अवैध दारू विक्री बंद झालेली नाही. गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण व्यसनांच्या आहारी जात आहे. गावात सणासुदीच्या काळात मद्यपींमुळे अशांतता निर्माण होते. बस स्थानकांवर मद्यपींचा उपद्रव नेहमी पाहायला मिळतो. प्रवासी, दुकानदार यांनाही मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो. दारूच्या बेकायदा विक्रेत्यांकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असून, त्यामुळे अनेक गैरप्रकार घडत आहे, असे माजी सरपंच हिराबाई मुळे यांनी सांगितले.
आम्ही १५ ऑगस्ट २०१८ रोजी वडोदबाजार पोलिस स्टेशनला निवेदन दिले. गावात अनेक दिवसांपासून होणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद व्हावी. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित होईल. आम्ही गावात स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत. लवकरच दारूबंदीसाठी ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी गावात महिला, युवक व ग्रामस्थ करीत आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन दारू बंद नसता आम्ही लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन निर्माण करू याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने बघावे.
- लिलाबाई काळे सरपंच
गावात सहज दारू उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण दारूच्या व्यसनांच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. गेल्या महिन्याभरात गावात अनेक अशा घटना घडल्या. गावाीतील तरुणांना जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले. गावातील दारू बंद होईपर्यंत आता शांत बसणार नाही, पोलिस प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावे.
- संतोष उमके, सामाजिक कार्यकर्ते, पीरबावडा