म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधींची फवारणी करत आहेत. सध्या तालुक्यात कोवळया पिकावरच फवारणी करावी लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या मका, बाजरी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले. शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत माजले. शेतकऱ्यांनी शेतातील मका व बाजरी पिकाचे कणसे व इतर धान्य आवरून गवताची साफसफाई करून गहू, हरभरा, उन्हाळी मका, कांदा, भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यामुळे रब्बीची पेरणी बऱ्यापैकी झाली. सध्या गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, फुलोऱ्यात आलेली तुर ही पिके तग धरून आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत असताना ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकत आहेत. त्यामुळे संपूर्ण वाढ होईपर्यंत हे पीक हाती लागते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जोमाने उगवण झालेल्या पिकावर काही भागात रानडुकरे तुटून पडत असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शेतकरी आपापल्या शेतात रात्री गस्त घालून पिकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. रानडुकरामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आहे. या परिस्थितीत वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर असल्यातरी ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे हाती काही पडते की नाही, असा प्रश्न आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत आहेत. बुजगावणे उभे करणे, वाऱ्यामुळे आवाज होईल अशा पद्धतीने झाडांवर काचेच्या बाटल्या बांधणे, फटाके वाजविणे, रात्री गस्त घालणे आदी उपाय शेतकरी करत आहेत. दरवर्षी नोव्हेबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु, डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी अजूनही पाहिजे तशी थंडीची चाहूल दिसत नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर, कधी ढगाळ वातावरण यामुळे पिके पिवळी पडून सुकत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे फारशी थंडी पडली नसल्यामुळे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या पिकांना निसर्गाचा कोणताही फायदा होत नाही. या प्रतिकुल हवामानामुळे गहू, हरभरा आदींसह रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
-कैलास पेहेरकर, शेतकरी