अ‍ॅपशहर

केवळ लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावर असून येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2020, 12:54 pm
उस्मानाबादः 'शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून लवकरच मदतीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,' अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवादही साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray


अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी काटगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत लवकरच लवकरच मदतीची घोषणा करू असं आश्वासन दिलं आहे. 'फक्त सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी वचनबद्ध आहे. मी इथं आकडे जाहीर करायला आलेलो नाही. त्यामुळं मी उगाच घोषणा करणार नाही. मी तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला दिलासा द्यायला आलोय,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ठाम आश्वासन दिलं आहे.


'माझं कर्तृत्व शून्य आहे पण तुमच्या आशीर्वादामुळं मी मुख्यमंत्री झालो. तुमच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडण्याचं काम याआधीही केलंय, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. आजची परिस्थिती भयानक आहे. वर्षाची सुरूवात करोनानं झाली, त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीच्या पावसामुळं नुकसान झालंय. पण तुम्ही धीर सोडू नका,' असा दिलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

'अतिवृष्टी होण्याचा धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं, असा अंदाज हवामान विभागनं वर्तवला आहे. आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. ते करू तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज