म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळिंब, केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्यावर्षी दुष्काळाने शेतकरी हैराण होता. यंदा चांगले पीक येऊनही लॉकडाऊनमुळे अडचण झाली. बाजारपेठा बंद असल्याने फळबागांना मागणी नाही, यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान स्वरुपात नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रकाश मुगदिया, मोहसीन अहमद यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून अधिकची कापूस खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या अनुषंगाने घाटी रुग्णालयातील सुविधा वाढवाव्यात, पैठण येथील आरोग्य पथकातील डॉक्टरांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीचे लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र व तिकिट खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, आदी मागण्या मांडण्यात आल्या.