म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून राज्यभराचे लक्ष वेधणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बहुचर्चित सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'एमआयएम'सोबत आघाडी करण्याचा कोणताही उल्लेख केला नाही. यामुळे 'एमआयएम'सोबत जाण्याबाबत आंबेडकरांच्या मनात 'शंका' असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
जबिंदा लॉन्स येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार सय्यद इम्तियाज जलील, वारिस पठाण, माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजय मोरे, अरुण घोडके, रविकांत राठोड, महेश मिनाळे, अर्जुन महाराज पांचाळ, मोहन गोरूडे, गणपत भसे, टी. एस. चव्हाण, बुलढाण्याच्या नगराध्यक्ष नजमुन्नीस्सा बेगम, अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघमोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात 'एमआयएम' अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिशी असल्याची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीमधील विविध समाज घटक आणि 'एमआयएम'च्या आघाडीतून आगामी काळात पाच खासदार निवडून आणण्याची ताकद उभी राहणार असल्याचे संकेत दिले. ओवेसी यांच्या भाषणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू झाले. या भाषणात ते देशाच्या आर्थिक विकासावर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले. मात्र, 'एमआयएम' आणि वंचित आघाडीबाबत आंबेडकरांनी कोणतेही ठोस वक्तव्य केले नाही. सर्वानी एकत्रित येऊन सत्ता परिवर्तन करण्याचे संकेत मात्र त्यांनी दिले. यामुळे आघाडीबाबतची अधिकृत घोषणा आणि पुढील दिशेबाबत कोणतेही संकेत डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून दिले नसल्याची चर्चा होती.
\Bखुर्च्यांची फेकाफेकी
\Bदरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी अधिवेशनात दोन लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली होती. ऐनवेळी 'डी'मध्ये आलेले तरुण, खुर्च्यांची फेकाफेकी आणि छोटे दगड मारण्यासारखे प्रकार सभेच्या ठिकाणी घडले. या सभेत सहा तास थांबलेल्या लोकांना पिण्यासाठीही वणवण भटकावे लागले. शहानूर मिया दर्गाच्या पुलाखालून अनेक जण रेल्वे ट्रॅक ओलांडून सभेच्या ठिकाणी पोहोचले होते. या ठिकाणी रेल्वे वाहतूक होत असताना कोणतीही घटना होऊ नये, यासाठी श्रीमंत गोर्डे पाटील आणि त्यांच्यासोबत अन्य विशेष पोलिस अधिकारी सहा ते सात तास थांबले होते. जबिंदा लॉन्स येथे सभेला जाणाऱ्या नागरिकांसाठी शहानूर मिया दर्गा पुलावरून वाहतूक रोखण्यात आली. सभा संपल्यानंतरही एक ते दीड तासांसाठी शहानूर मिया दर्गा आणि बीड बायपास रोडवरील वाहतूक व्यवस्थेत काही काळ कोंडी निर्माण झाली होती. काही वेळेनंतर ही वाहतूक सुरळीत झाली.
………
\Bकोण काय म्हणाले...?\B
वंचित समाजाच्या मतांवर सत्तर वर्षांपासून सत्तेचा उपभोग घेणाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम' एकत्र आले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता सत्तेतून बाहेर पडावे लागणार आहे. आताच महाराष्ट्रातील काही नेत्यांना संविधान बचावची आठवण आली आहे. २०१९मध्ये बहुजन, मागासवर्गीय, मुस्लिमांच्या मतांवर अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात यश मिळवू.
- इम्तियाज जलील, आमदार
वंचित आघाडीची प्रगती आहे. बाळासाहेबांना आगामी काळात मुख्यमंत्री बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 'भाजप'वाल्यांकडे पैसा जास्त आहे. यामुळे पैशांना भुलू नका.
- लक्ष्मण माने, माजी आमदार
शेतकरी आत्महत्या करित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन दयावे, अशी मागणी केली आहे. 'भाजप'च्या प्रत्येक आमदार, खासदारांने तसेच लोकप्रतिनिधींनी चार ते पाच गाई पाळल्यास त्यांचे रक्षण होईल.
- अरूण घोडके
महिलांना त्यांचा हक्क दयावा. ५० टक्के महिलांना प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी उपाय योजना करावी.
- रेखाताई ठाकूर