औरंगाबाद : मुख्य जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्या २५४ पाणी चोरांवर महापालिका पोलिसांत गुन्हे दाखल करणार आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून पाणी वापराचे पैसे देखील वसूल केले जाणार आहेत.
मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर महापालिकेने गेल्या महिन्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस मोहीम राबवली. दोन दिवसात २५४ नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे दोन 'एमएलडी' पाणी वाढल्याचा दावा करण्यात आला होता. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार या सर्व पाणी चोरांविरोधात पोलिसांत 'एफआयआर' दाखल केला जाणार आहे. त्यांनी मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेणे सुरू केल्यापासून त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करण्याचे देखील ठरविण्यात आले आहे. याप्रकरणांतील पंचनामे आणि अन्य कागदपत्रे उपायुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी पाणीपुरवठा विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत 'एफआयआर' दाखल होतील असे मानले जात आहे.