\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bशेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे शहरात स्वागत करण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी 'महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार आहे. या निर्णयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात भारतीय विद्यार्थी सेना, एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने स्वागत केले. महाराष्ट्रातील दुष्काळ, अवकाळी पाऊस यांनी शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. परिसरात फटाके फोडून पेढे वाटण्यात आले. यावेळी 'भाविसे'चे डॉ. तुकाराम सराफ, अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे, पूनमचंद सलामपुरे, तुकाराम शिरसाट, कपिल धोंगडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे डॉ. उल्हास उढाण, अमोल दांडगे, डॉ. दीपक बहिर, सादिक शेख, दादाराव कांबळे, शरद शिंदे, सचिन बोराडे, 'एनएसयूआय'चे नीलेश आंबेवाडीकर, इरफान खान, बाळू गजहंस, संकेत कांबळे, योगेश बहादुरे, कृष्णा खरात आदी उपस्थित होते.