म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१९-२० या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. शेतकऱ्यांनी तातडीने यात सहभागी होत पीक विमा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता कर्ज देणाऱ्या बँकेमार्फत भरण्यात येईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचे बचत खाते असलेल्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत व सी. एस. सी. सेंटरमधून अर्ज करून विमा हप्ता भरावा. रब्बी हंगामात औरंगाबाद जिल्ह्यासाठी बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.ची नियुक्ती करण्यात आली आहे.
या योजनेबंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा अन्नधान्ये व गळीत धान्य पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या १.५० टक्के, तर नगदी पिक कांदा यासाठी पाच टक्के आहे. सर्व शेतकरी (कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखीम स्तर देय राहील. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मोटे यांनी दिली.