म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोना रुग्णांची वाढती संख्या हा भीती आणि चिंतेचा विषय असला तरी मराठवाड्यात सध्या उपचार घेत असलेले रुग्णांपेक्षा (सक्रीय) उपचारानंतर ठणठणित होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात एकूण सक्रीय रुग्ण १२५२ असून २१६४ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. १५७ जणांचा मृत्यू झाला.
प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.५० टक्के असून मृत्युदर ४.३० टक्के आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. गुरुवारच्या (११ जून) अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यात २४२० जणांना बाधा झाली, त्यापैकी १३४२ रुग्ण उपचारानंतर घरी गेले. औरंगाबादमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण (डबलिंग रेट) १८.६० टक्के असून मृत्युदर ५.१७ आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या खालोखाल जालना जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जालना जिल्ह्यात २४८ रुग्णांपैकी १४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर सात जणांचा मृत्यू झाला. सध्या ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात मृत्युदर २.८२ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.४७ टक्के आहे. मराठवाड्यात सर्वात कमी रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत. तेथील एकूण ८२ रुग्णांपैकी ६२ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले, तर दोघांचा मृत्यू झाला आणि १८ जणांवर उपचार सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण ९१ रुग्ण असून ७७ रुग्ण उपचार घेऊन परतले, तिघांचा जणांचा मृत्यू झाला, तर ११ सक्रीय रुग्ण आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण २१० रुग्णांपैकी १८२ जणांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. आता २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण २२४ रुग्णांपैकी १८२ रुग्ण बरे झाले, तर ७३ रुग्ण सक्रीय आहेत. लातूर जिल्ह्यातील १८२ एकूण रुग्ण असून १२८ जण बरे झाले, तर २८ जणांवर उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण १३८ रुग्णांपैकी ४५ रुग्णांवर उपचार सुरू असून ९० जण बरे होऊ घरी परतले आहेत.
\Bमराठवाड्याचा मृत्युदर ४.३० टक्के
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.५० टक्के\B