म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोनाचे संकट, लॉकडाऊनचा फटका तसेच स्थानिक भागातून गव्हाची मुबलक आवक यामुळे यंदा परराज्यातून गव्हासह तांदळा आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. यंदा तांदळाचे उत्पादन वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत. गव्हाचे भाव स्थिर आहेत.
गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, पाणीटंचाई आदींमुळे ठोक बाजारात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत होती. प्रामुख्याने मार्च, एप्रिलपासून आवक सुरू होते. त्याचकाळात वार्षिक धान्य खरेदी सुरू होते. मात्र, यंदा मार्चअखेरीस करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाल्याचा फटका परराज्यातून येणाऱ्या मालावर झाला. सुरुवातीच्या अडचणीनंतर माल वाहतूक सुरळीत सुरू झाली. त्यामुळे धान्य उशिरा आले. त्यातच स्थानिक भागात यंदा गहू, ज्वारीचे चांगले उत्पादन झाल्याने ग्रामीणमधून होणारी मागणी कमी राहिल्याची माहिती जाधववाडी येथील धान्य मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैय्यालाल जैस्वाल यांनी दिली. गेल्या वर्षी परराज्यातून एप्रिल व मे या दोन महिन्यांत ७८ हजार ४२५ क्विंटल गहू आयात करण्यात आला. यंदा केवळ ४६ हजार १४० क्विंटल गहू आला. सध्या गव्हाचे भाव १६०० ते साडेतीन हजार रुपये या दरम्यान आहेत.
\Bतांदळाच्या भावात पाच टक्क्यांची घट \B
येथील ठोक बाजारात प्रामुख्याने कर्नाटक, दिल्ली येथून तांदूळ येतो. गेल्यावर्षी एप्रिल व मेमध्ये १४ हजार ७०० क्विंटल तांदळाची आवक झाली होती. यंदा या दोन महिन्यात १० हजार १३० क्विंटल आवक झाली, अशी माहिती बाजार समितीने दिली. मात्र, यंदा तांदळाचे भाव गेल्या वर्षीपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी तीन हजार ते दहा हजार रुपये प्रती क्विटल एवढा भाव होता. यंदा २५०० ते आठ हजार रुपये, असा दर असल्याचे व्यापारी जैस्वाल यांनी सांगितले.