डॉ. शिवाजी हुसे यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'साहित्य संस्थांचे कार्यक्रम आणि साहित्य संमेलनात भटक्या समाजातील लेखकांना अजूनही स्थान मिळत नाही. साहित्य व्यवहारात भटक्यांचे साहित्य जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवले गेले. हा लेखक अभिव्यक्त होऊ लागला ही महत्त्वाची बाब आहे' असे प्रतिपादन समीक्षक डॉ. शिवाजी हुसे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
के. ओ. गिऱ्हे लिखित गोपाळ संस्कृती आणि मच्छिंद्र धनवटे लिखित 'उघड्यावरती पाल' या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर अप्पर आयुक्त डॉ. शिवानंद टाकसाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक पवार, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. नवनाथ गोरे, सुरेश चव्हाण, के. ओ. गिऱ्हे व मच्छिंद्र धनवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुस्तकांवर हुसे यांनी भाष्य केले. 'दोन्ही पुस्तकांचे लेखक भटक्या समाजाचे असणे हे समान सूत्र आहे. भटक्या समाजाची नवीन पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर लेखनातून व्यक्त होत आहे. पण, साहित्य व्यवहारातही भटक्यांना उपेक्षेची वागणूक मिळत आहे. साहित्यातही ते भटकेच राहिले. लेखक बोलू व लिहू लागले ही समाधानाची बाब आहे' असे डॉ. हुसे म्हणाले. गिऱ्हे यांनी लेखन प्रवास मांडला. गोपाळ समाज भारतभर विखुरला आहे. या समाजाचा मौखिक इतिहास व कथात्म वाड्मय शब्दबद्ध करण्याचा निर्णय घेतला. विकासाच्या परिघात दुर्लक्षित राहिलेल्या समाजाचा इतिहास पुस्तकरुपाने लिहिता आला याचे समाधान आहे असे गिऱ्हे म्हणाले. डॉ. शिवाजी वाठोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.