म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, विधानसभा निवडणूक यामुळे दिवाळी जवळ येऊनही बाजारपेठेत गर्दी झाली नव्हती. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पण पाऊस झाला नाही त्यामुळे दुपारनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली होती. रात्री पावणेनऊच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी पाऊस सुरू होतो. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. विधानसभेचे मतदान झाल्यानंतर औरंगाबादवासीय खरेदीसाठी गर्दी करतील अशी अपेक्षा होती. पण पावसाने या अपेक्षेवरही पाणी फेरले. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. एक दोन हलक्या सरी कोसळल्या. पण कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन औरंगाबादकरांनी बाजारपेठेत कपडे, वस्तू, किराणा खरेदीसाठी गर्दी केली. पैठणगेट ते गुलमंडी हा रस्ता तर दुपारीच जॅम झाला. शहराच्या विविध भागातून मुख्य बाजारपेठेकडे नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे जालना रोडवर ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळीही पाऊस न झाल्याने गर्दी कायम होती. रात्री पावणेनऊच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरु झाला आणि गर्दी ओसरली.