म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा मंगळवारी मंजूर केला. त्यामुळे आता अवघ्या चार महिन्यांसाठी उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी पॅटर्न औरंगाबाद शहरात प्रथमच राबविला जाणार आहे.
राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठीच्या १६८० कोटी रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा निषेध करीत महापालिकेतील भाजपचे विजय औताडे यांनी सोमवारी महापौरांकडे आपल्या उपमहापौरपदाचा राजीनामा सादर केला होता. मंगळवारी राजीनामा मंजूर केल्यावर महापौर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'उपमहापौरांनी राजीनामा दिला तसा स्थायी समितीच्या सभापतींनी, विषय समिती आणि प्रभाग समितीच्या सभापतींनीदेखील राजीनामा दिला पाहिजे. कारण ते देखील आमच्याच मतांच्या आधारे सभापती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामे खिशात का ठेवले आहेत? राजीनामा देऊन प्रश्न सुटत नसतात. पदावर राहूनच प्रश्न सोडवून घ्यावे लागतात.'
उरलेल्या चार महिन्यांसाठी उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार का, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'पद जास्त दिवस रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घ्यावीच लागेल. प्रशासन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करेल. राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आले आहेत. महापालिकेच्या नव्याने होणाऱ्या उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत हे तिन्हीही पक्ष एकत्र येतील, असे चित्र आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग होणार आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - २९
भाजप - २३
एमआयएम - २४
काँग्रेस - ११
बहुजन समाज पार्टी - ०५
राष्ट्रवादी काँग्रेस - ०४
रिपाइं (डी) - ०२
अपक्ष - १७
एकूण - ११५