म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या फेरीतही कमी प्रतिसाद मिळाला आहे. साडेतीन हजार निवड विद्यार्थ्यांपैकी सायंकाळपर्यंत फक्त दीड हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरीसाठी २२ जुलै रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली. औरंगाबाद शहरात तीन हजार ५२२ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलै दरम्यान प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जात कागदपत्र जमा करत प्रवेशाची निश्चित करायची आहे. दोन दिवसांत दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली होती. दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिला पसंतीक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २,३८४ एवढी आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पहिली फेरी १२ ते १६ जुलै दरम्यान पूर्ण झाली. यामध्ये ११ हजार ७०३ विद्यार्थ्यांची निवड होती. त्यापैकी सात हजार ४६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश निश्चितीसाठी गुरुवारचा दिवस विद्यार्थ्यांकडे आहे. प्रवेशाची प्रक्रिया तीन फेरींमध्ये होणार आहे. ती पुढच्या आठवड्यात होणार आहे.