म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेशनवरील धान्य देण्याऐवजी लाभार्थींच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करून सरकार गेल्या ६३ वर्षांपासूनची सार्वजनिक वितरण प्रणाली मोडीत काढत आहे. यामुळे रेशन व्यवस्था संपुष्टात येणार असल्याने सरकारच्या 'डीबीटी' धोरणाविरोधात मंगळवारी (चार डिसेंबर) औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशनचे अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केले. आमखास मैदानात आयोजित सभेमध्ये मोदी यांनी 'डीबीटी', रोख सबसीडी म्हणजे मृत्यूदंड असून, सरकारने यावर विचार करावा अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये संघटनेची शक्ती दाखवू, असा इशारा दिला.
दुपारी बारा वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील रेशन दुकानदार; तसेच लाभधारकांनी क्रांतीचौकात मोर्चासाठी मोठी गर्दी केली होती. प्रल्हाद मोदी, डी. एन. पाटील, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, आर. एल. आंबुलकर यांची उपस्थिती होती. मोर्चा क्रांतीचौक, पैठणगेट, किलेअर्कमार्गे आमखास मदौनावर गेल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी सभेसाठी आमदार अब्दुल सत्तार, कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने आदींची उपस्थिती होती.
यावेळी मोदी म्हणाले की, सरकारला वाटत असेल की रेशन दुकानदार काळाबाजार करतात, तर सरकारने रेशन दुकानदारांना प्रतिमहिना ५० हजार रुपये पगार द्यावा. थेट लाभाची योजना राबवल्यास मृत्युदंड दिल्यासारखे होईल. लाभार्थींनी बँकेचे खातेच दिले नसते, तर ही योजनाच सुरू झाली नसती. या निर्णयामुळे कुपोषण वाढेल, घराघरात भांडणे वाढतील.
रेशन दुकानांवर बायोमेट्रिक प्रणाली राबवण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारचे ३० हजार कोटी रुपये वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना सहभागी करुन घेतले होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांना दिलेल्या निवेदनामध्ये शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे, केरोसीनचा कोटा पूर्ववत सुरू करावा, देशभरातील पवानाधारकांना ३०० रुपये प्रतिक्विंटल कमिशन द्यावे, दुकानाच्या जागेचे भाडे देण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
सभेमध्ये अध्यक्ष डी. एन. पाटील, विश्वंभर बसू, आर. एल. आंबुलगेकर यांची भाषणे झाली.
\Bमोर्चात राजकीय खिचडी; सत्तारांचा सभेतून काढता पाय\B
स्वस्त धान्य दुकानदार, सर्वसामान्य लाभार्थींसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनीही हजेरी लावली होती, सभेमध्ये भाषण करताना शिवेसनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधी टीका करण्यास सुरुवात केली व मोदी सरकार चुकीची धोरणे राबवत असल्याचे सांगितले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाषण केले. 'ते मोदी आश्वासन देतात. अनेकदा खोटे बोलतात, पण हे मोदी तसे नाहीत, हे खरे बोलतील. एक खरा मोदी आपल्यात आला आहे,' असे म्हणत त्यांनी सरकारविरुद्ध भाषण केले. एकीकडे निर्णयाला विरोध करणारेच कायदा बदलू नये, असे म्हणतात व त्याला पाठिंबा देतात, असे म्हणत, 'केवळ फुकटच्या पाठिंब्याचा काहीच उपयोग नाही,' असे म्हणत सत्तार यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही चिमटे काढले. सरकारवरील ही टीका मात्र प्रल्हाद मोदींना आवडली नाही, 'त्यांनी आपल्या भाषणामध्ये सत्तार यांच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला व म्हणाले की, बहुदा सत्तार यांना राजकीय भाषणासाठी मंच मिळत नाही. हा राजकीय मंच नाही. तुम्ही मंत्री राहिला आहात. येथे राजकारण करून घरात फूट पाडायचा प्रयत्न करत आहात. 'डीबीटी'चा प्रस्ताव केंद्रातील आघाडी सरकारने आणला होता, हे विसरू नका, असे मोदी यांनी सत्तार यांना सुनावताच सत्तार यांना राग आला आणि त्यांनी सभा सोडून निघून गेले.