अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितालाच हवे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तंत्रशिक्षण विभागाने इंजिनीअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितीच्या वेळीच असणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी नसेल तर, प्रवेश खुल्या प्रवर्गातून धरला जाणार आहे.
सीईटी दिलेल्या राज्यातील विद्यार्थी, पालकांचे अभियांत्रिकी प्रवेश वेळापत्रकाकडे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. 'बीई', 'बीटेक' पदवी अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आले. २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश निश्चितीच्या वेळीच सादर करावे लागणार आहे. mahacet.org.in आणि dtemaharashtr.gov.in वेबसाइट पद्धतीने होणार आहेत. राखीव जागेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली जायची. यंदा ही सुविधा बंद करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. यासह विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रात मूळ कागदपत्रे दाखवून त्याचे दोन सेट झेरॉक्सप्रती सोबत ठेवत, त्यावर सही शिक्का त्याचवेळी घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेशापर्यंत त्या कागदापत्रांची प्रत जपून ठेवत एक प्रत एआरसी सेंटर आणि एक प्रत प्रवेश निश्चितीच्या वेळी केंद्रात दाखवून ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे तेथे जमा करायची आहे. प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत.
असे आहे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज नोंदणी १९ जून पर्यंत
अर्ज पडताळणी....... १९ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी.. २१ जून
कागदपत्रातील त्रुटी दुरुस्तीसाठी.. २२ ते २३ जून
पहिल्या फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी...२४ जून
पहिल्या फेरीसाठी पर्याय..२५ ते २८ जून
जागांचे वाटप........२९ जून
प्रवेश निश्चितीसाठी...३० जून ते ४ जुलैपर्यंत