म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सध्या देशात फक्त जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द केल्याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी देखील या बाबीची गांर्भीयाने दखल घेतली आहे. गोपनीय शाखेने शहरात शिक्षण घेत असलेल्या ४१ काश्मिरी विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली. मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी स्वत: या विद्यार्थ्यांशी संवाद साधत काही अडचणी आहेत, का याबाबत माहिती जाणून घेतली.
जम्मू काश्मीरसाठी लागू असलेले कलम ३७० सोमवारी राज्यसभेत तर मंगळवारी लोकसभेत बहुमताने रद्द करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान त्याला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेत शहरात गेल्या दोन दिवसांपासून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची पाच पथके सकाळपासून सातत्याने पेट्रोलिंग कामी नेमण्यात आली होती. विशेष शाखा, गोपनीय शाखेची देखील पथके या संदर्भात गस्तीवर पाठवण्यात आली होती. मात्र, शहरात या संदर्भात कोणताही विरोध झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
…
काश्मिरी विद्यार्थ्यांची भेट
जम्मू काश्मीर राज्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आहेत. शहरातील विविध महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहेत. एकूण ४१ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. विविध हॉस्टेल तसेच खाजगी रूम करून आणि धर्मशाळेत या विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. या विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना काही अडचणी येत आहेत का याबाबत चौकशी करण्यात आली. मंगळवारी त्यांना पोलिस आयुक्तालयात बोलाविण्यात आले. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी देखील आस्थेने या विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही अडचणी आल्यास त्यांना पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.