अ‍ॅपशहर

१७.५ लाख टन ऊस शेतातच; प्रचंड उत्पादनामुळं अद्याप गाळप नाही

महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपूनही सुमारे १७ लाख ५० हजार टन ऊस अद्याप शेतातच पडून आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढले असून, गाळपाचे काम जूनपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 May 2022, 7:46 am
वृत्तसंस्था, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रतिनिधी फोटो


महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपूनही सुमारे १७ लाख ५० हजार टन ऊस अद्याप शेतातच पडून आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढले असून, गाळपाचे काम जूनपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो व एप्रिल मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदा राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये उसाचे जादा उत्पादन झाले. त्यातील सात जिल्हे मराठवाड्यातील आहेत. गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने उसाचे उत्पादनही वाढले. त्यामुळे काही जिल्ह्यांतील ३०हून अधिक साखर कारखान्यांमध्ये गाळपाचे काम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, 'अद्याप शेतातच उभ्या असलेल्या साडेसतरा लाख टन उसापैकी बहुतांश उसाचे गाळप ३१ मेपर्यंत पूर्ण होईल. अहमदनगर व जालना जिल्ह्यांमध्ये मात्र ते जूनपर्यंत लांबण्याचे चिन्ह आहे. ऊसतोडणीसाठी १२९ कामगारांना आणण्यात आले असून, ते सर्वजण मराठवाड्यात काम करीत आहेत. जालनामध्ये २९ कामगार कार्यरत आहेत.'

१५ मेपर्यंत राज्यातील एकूण १९९ साखर कारखान्यांपैकी १२६ कारखान्यांनी या हंगामाच्या गाळपाचे काम थांबवले आहे. २५ मेपर्यंत ही संख्या १६३ होईल. उर्वरीत ३६ कारखान्यांमध्ये हे काम पुढेही सुरूच राहणार आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख टन कापणी न झालेला ऊस शेतातच उभा आहे. त्यापाठोपाठ जालना (३.९० लाख टन), अहमदनगर (३ लाख टन), लातूर (२.४२ लाख टन), उस्मानाबाद (२.३८ लाख टन), सातारा (१ लाख टन), नांदेड (६३ हजार टन), नंदुरबार व औरंगाबाद (प्रत्येकी ५० हजार टन) व परभणी (३० हजार टन) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

पुढील वर्षाच्या गाळपाची आखणी सुरू

राज्य सरकारने पुढील वर्षाच्या गाळपाबाबतही आखणी करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार साखर कारखान्यांतील गाळपाचे काम १ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दरवर्षीपेक्षा साधारण १५ दिवस आधी सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या राज्यातील साखर कारखान्यांमध्ये एका दिवसात ८ लाख टन उसाचे गाळप होते. ते पुढील वर्षी २५ हजार टनांनी वाढवण्याचे प्रयत्न आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज