म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी, बारावीसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या 'पर्यावरण शिक्षण' व 'जलसुरक्षा' विषयाबाबत शिक्षण मंडळापासून ते शिक्षकांपर्यंत अनास्थाच असल्याची धक्कादायक बाब समोर आली. विषयाचे महत्त्व, मूल्यांकनातील बदल, गुणविभागणी पद्धतीबाबत विभागीय पातळीवरील प्रशिक्षण बुधवारी शिक्षण मंडळाने आयोजित केले होते. प्रशिक्षणासाठी सभागृह तयार करण्यात आले, तज्ज्ञांसाठी पुष्पगुच्छ आणले, विविध जिल्ह्यातून तज्ज्ञ मंडळी आली. मात्र, चार तास प्रतीक्षा केल्यानंतरही शिक्षक न आल्याने प्रशिक्षण पूर्ण न करता तज्ज्ञांना परतावे लागले.
शालेयसह उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना पर्यावरणासह पाणी व्यवस्थापनाचे ज्ञान मिळावे यासाठी अकरावी, बारावीला विषय बंधनकारक करण्यात आला. ५० गुणांसाठी असलेल्या विषयासाठी श्रेणी द्यायची की, गुण याबाबतचा संभ्रम दूर होत नाही तोच प्रशिक्षणातील गोंधळ समोर आला. विषयाचे महत्त्व त्यातील बदल, गुणपद्धती, मूल्यांकन याबाबत प्रशिक्षण बुधवारी निश्चित करण्यात आले. देवगिरी कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण निश्चित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता प्रशिक्षण सुरू होणार होते. विभागीय पातळीवर विषयाच्या संबंधित शिक्षकांसाठी प्रशिक्षण होते. विविध जिल्ह्यातून विषयाचे सात तज्ज्ञ सभागृहात आले. विभागाचे प्रभारी सचिवही आले. सकाळचे अकरा वाजले, बारा, एक वाजला तरी सभागृहात शिक्षकच नाहीत. त्यामुळे कितीवेळ थांबणार असा प्रश्न तज्ज्ञांना पडला. राज्यमंडळाने पाठविलेल्या तज्ज्ञांनी तीन, साडेतीन तास शिक्षकांची वाट पाहिल्यानंतर मंडळ कार्यालय गाठले. विषय प्रशिक्षणाबाबत संबंधित संस्था, कॉलेज, शिक्षकांना ई-मेलद्वारे संपर्क साधल्याचे मंडळाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अनेकांपर्यंत संदेशच पोहचला नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मंडळ अन् संस्थांच्या गोंधळात विषयाचे महत्व दुर्लक्षित होत असल्याचे समोर आले. परीक्षा काही दिवसांवर आली असताना हा बेजबाबदारपणा चर्चेचा विषय ठरला आहे.
असा आहे विषय
विषय ५० गुणांसाठी आहे. यामध्ये प्रकल्प कार्यासाठी ३०, तर जर्नल-सेमीनार कार्यसाठी २० अशी गुणांची विभागणी आहे. अकरावीसाठी बाह्य व अंतर्गत परीक्षक, तर बारावीसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येणार आहे. परीक्षकांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना ५० पैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रुपांतर करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' अशा श्रेणीत रुपांतर असेल, असे स्पष्ट केले आहे. 'डी' श्रेणी म्हणजे विद्यार्थी नापास असणार आहे. पूर्वी गुण देण्याची पद्धत होती. सत्र सुरू झाले तेव्हा श्रेणी पद्धतीने सांगण्यात आले. त्यानंतर गुण पद्धती आणि आता पुन्हा श्रेणी पद्धती असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
विषयाचे महत्व
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा विषय इयत्ता अकरावी आणि बारावीच्या स्तरावर स्वतंत्र व अनिवार्य ठेवला आहे. आजच्या जागतिक पर्यावरण विषयक सामाजिक व आर्थिक समस्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्या सोडवण्याची साधने व निरनिराळे मार्ग यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे. या पाठ्य पुस्तकातील विषय अशाप्रकारे मांडले आहेत की ज्यामुळे शाश्वत विकासाची संकल्पना विद्यार्थ्यांना कळून येईल. पाठ्यपुस्तकांची रचना अशी केली आहे की, विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक दृष्टिकोण कृतीवर आधारित अध्यापन आणि सामूहिक कृती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पाठ्यपुस्तकांमध्ये शाश्वत विकास, जैवविविधता, परिसंस्था, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, जलसुरक्षा, मानव व पर्यावरण, पर्यावरणीय प्रदूषण व उपाय योजना इत्यादी पर्यावरणाचे मुद्दे मांडले आहेत. विद्यार्थ्यांना आजच्या जगातील पर्यावरणविषयक समस्या सोडवण्यासाठी सहभाग घेऊन पुढाकार घेण्यात प्रोत्साहन मिळेल. कृतीयुक्त शिक्षण हे प्रभावी शिक्षण असल्यामुळे सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
डॉ. बापूसाहेब भोसले
पर्यावरण तज्ञ अभ्यास मंडळ सदस्य