म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झाल्टा परिसरातील २५ एकर शासकीय गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी कारवाई करण्यात आली. महसूल, पालिका आणि पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत सुमारे पाचशे झोपड्या हटविण्यात आल्या. पहाटे चार ते सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
चिकलठाणा वॉर्डातील गट क्रमांक ४७२मधील पंचवीस एकर शासकीय गायरानावर गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी पत्र्याच्या कच्च्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. सोमवारी पहाटेपासून या कारवाईला सुरूवात करण्यात आली. येथील नागरीकांना यापूर्वीच पोलिसांच्या वतीने समज देण्यात आली होती. यामुळे काही नागरिकांनी झोपड्या रिकाम्या केल्या होत्या. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने हे सर्व अतिक्रमण हटवले. सायंकाळपर्यंत येथील अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले होते. यावेळी महसूल पथक प्रमुख ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार रमेश मुंदलोड, सतीश सोनी, नायब तहसीलदार दत्ता नीलावाड, तलाठी, अनिल सूर्यवंशी, विशाल मगरे यांच्यासह महापालिकेचे मालमत्ता अधिकारी वामनराव कांबळे यांनी पथकासह ही कारवाई यशस्वी केली.
…
\Bतगडा पोलिस बंदोबस्त
\Bअतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिसांच्या वतीने जय्यत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निकेश खाटमोडे पाटील, एसीपी गुणाजी सावंत यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक, दहा पीएसआय, शंभर पोलिस कर्मचारी, पन्नास महिला पोलिस कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्सच्या दोन तुकड्या, वज्र वाहन, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंब आदीचा बंदोबस्तामध्ये समावेश होता.
…
झाल्टा येथील अतिक्रमण मोहीम शांततेत पार पडली. कोणत्याही प्रकारची अनूचित घटना या ठिकाणी घडली नाही. नागरिकांना पूर्वीच कल्पना देण्यात आल्याने त्यांचे देखील सहकार्य लाभले.
- सुरेंद्र माळाले, पोलिस निरीक्षक
\B....अन् निर्विघ्न
\B- ४७२ गट क्रमांक
- ५०० झोपड्या हटवल्या
- २५ एकरावरचे अतिक्रमण
- ४ वाजता पहाटे कारवाई
- ६ वाजेपर्यंत सायंकाळी