‘स्कील युनिव्हर्सिटी’साठी पाठपुरावा
म टा...
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील तरुणांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य गुण रुजवता यावेत आणि तरुणांना स्वयंरोजगारासाठी उभे करता यावे, शेती व शेतीशीसंबंधित पूरक उद्योग-व्यवसाय तरुणांना सुरू करता यावेत, या व्यापक दृष्टिकोनातून 'स्कील युनिव्हर्सिटी'ची मागणी करणार असून, त्यासाठी पाठपुरावाही करणार आहे. याच 'स्कील युनिव्हर्सिटी'च्या माध्यमातून सुमारे १० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असेल, असे मत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी 'रुरल चेंबर ऑफ कॉमर्स'च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
शहरातील एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात रविवारी (१५ जुलै) झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार नरेश यादव, ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यज्ञदेव कवडे, निवृत्त न्यायाधीश व अखिल भारतीय हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, उद्योजक अखिलेश कटियार (दिल्ली), उद्योजक शिवाजी झोंबाडे (अमरावती), उद्योजक राम जोगदंड (पुणे), उद्योगीय रिसर्च कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय माने, 'रुरल चेंबर ऑफ कॉमर्स'चे अध्यक्ष अतुल घुईखेडकर, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेंद्र गावित आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. भापकर म्हणाले, आज अनेक शेतकरी उत्तम, गुणवत्तापूर्ण उत्पादने घेत आहेत. पीक पद्धतीसह ज्ञान-तंत्रज्ञान-कौशल्यामुळे एकरी २५ हजारांपेक्षाही जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. मात्र अजूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात तिच तिच पिके घेत आहेत. त्याचवेळी आज अनेक शेकऱ्यांच्या तरुण मुलांना शेती काय असते माहीत नाही आणि पाच हजारांवर नोकरी करण्याची त्यांची तयारी असते, अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, तसेच ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य समजून घेतले पाहिजे. आज प्रत्येकाच्या शेतामध्ये शेततळे होऊ शकते. जालना जिल्ह्यातील कडवंची येथे साडेचारशे शेततळी आहेत. गटशेतीच्या माध्यमातून ३०-४० हजारांचे उत्पन्न लाखापर्यंत नेणेही शक्य झाले आहे. त्यासाठीच मार्केटिंग, प्रोडक्शन, प्रोसेस जाणून घेतले पाहिजे. याच उद्देशाने 'स्कील युनिव्हर्सिटी' सुरू करण्याची विनंती राज्य सरकारकडे करणार आहे. यातून दहा लाख तरुणांना स्वयंरोजगारासाठी उभे करणे शक्य आहे, असेही डॉ. भापकर म्हणाले. ग्रामीण शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यासह समन्वय निर्माण करण्याच्या हेतुने 'रुरल चेंबर ऑफ कॉमर्स'ची स्थापना झाल्याचे डॉ. माने म्हणाले. प्रदीप देशमुक यांनीही मनोगत व्यक्त केले.
दहशतवादापेक्षा बेरोजगारवाद गंभीर
आज राज्यातील-देशातील बेरोजगारांचे काय करायचे, हा फार मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. हजारोंच्या संख्येने बाहेर पडणारे इंजिनिअर पाच हजार रुपयांसाठीही महाग आहेत, अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळेच आज दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही बेरोजगारवाद खूप जास्त गंभीर आहे आणि त्यामुळेच अराजक स्थिती निर्माण होऊ शकते. आजची सर्वार्थाने भ्रष्ट असणारी शिक्षण पद्धती या स्थितीला जबाबदार आहे आणि त्यामुळेच तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळवणे गरजेचे आहे, असे मत अतुल घुईखेडकर म्हणाले.