म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना खरीप बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. पैठण रोड येथील कृषी विस्तार शिक्षण केंद्रात विक्रीला सुरुवात करण्यात आली असून, शेतकऱ्यांना दूरध्वनी किंवा व्हॅट्स अॅपद्वारे मागणी नोंदविता येणार आहे.
करोना विषाणू संसर्ग व 'लॉकडाऊन'मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यात आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कृषी विद्यापीठानेही खरीप बियाणे उपलब्ध करून दिले आहे. पैठण रोड येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात बियाणे उपलब्ध आहे. औरंगाबाद विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या उपस्थितीत बियाणे विक्रीला सुरुवात करण्यात आली. यावेळी हिमायत बाग येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, कृषी तंत्रविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी पाथ्रीकर म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी लोकसंख्या ३३ कोटी होती तरीही जनतेची उपासमार होत होती. आज १३३ कोटी लोकसंख्या झाली तरीही अन्न मिळत नाही, असे कधी वाचण्यात आले नाही. याचे सर्व श्रेय कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांना जाते.
या वेळी प्रमुख शास्रज्ञ डॉ. एस. बी. पवार यांनी उपस्थितांना तूर पीक लागवडीबाबत माहिती दिली. डॉ. के. टी. जाधव यांनी, तुम्ही शेती पिकाची निविष्ठा आणि खर्च याची नोंद ठेवा म्हणजे हंगाम शेवटी आपल्याला निव्वळ काय पदरात पडले ते समजते, असे सांगितले. विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.
मागणी नोंदविण्याचे आवाहन
चालू खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तूर, मूग आणि खरीप ज्वारी अशा या तीन पिकांचे सुधारित वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत पाच क्विंटल 'बीडीएन ७११' या वाणाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी या बियाणांच्या मागणीसाठी केंद्र अधिकारी रामेश्वर ठोंबरे यांच्याशी (९४२०४०६९०१) संपर्क साधवा. फोन किंवा व्हॅट्स अॅपद्वारे मागणी नोंदवावी. 'लॉकडाऊन'च्या काळात गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एकाने बियाणे घेऊन जावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे दरपत्रक
पीक.............वाण..................दर प्रती किलो....प्रती बॅग वजन.....प्रती बॅग दर
तूर..........बीडीएन ७११(पांढरा)....१३०............सहा किलो.........७८० रुपये
बीडीएन ७१६ (लाल)
बीएसएमआर ७३६ (लाल)
मूग.........बीएम २००३-२...............१३०..........सहा किलो..........७८० रुपय
ज्वारी......परभणी शक्ती..................६०............चार किलो.........२४० रुपये