परभणी : कर्जबाजारीपणामुळे दोन दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण, लोणी आणि सिमुरगव्हाण तर पूर्णा तालुक्यातील देगाव या ठिकाणी या घटना घडल्या.
पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे परमेश्वर बन्सीधर घाडगे (वय ४५) या शेतकऱ्याने शनिवारी सकाळी घरातील माळवदाच्या कडीला गळफास घेतला. घांडगे यांच्यावर बँकेचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे या चिंतेत त्यांनी आत्महत्या केली. अमोल घांडगे यांच्या माहितीवरून पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद झाली. दुसरी घटना तालुक्यातीलच लोणी बु. येथे घडली. मारोती निवृत्ती रासवे (५२) यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांनी घराच्या छतावर जाऊन विष घेतल्यामुळे, उशिरापर्यंत कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यांना तात्काळ परभणी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे चार एकर जमीन असून, बँक सोसायटीचे कर्ज होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसरी घटना शुक्रवारी सकाळी पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे घडली. या ठिकाणच्या कैलास बाळासाहेब उगले (२५) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच सभोवतालच्या शेतकऱ्यांनी त्यांना पाथरीच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सततची नापिकी आणि कर्जाचे हप्ते या चिंतेत त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
याशिवाय, पूर्णा तालुक्यातील देवगाव येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शेतातील झाडाला वैजनाथ बाबुराव वळसे (४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे आणि खासगी कर्ज होते. तसेच नापिकीमुळेही ते त्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली.
मराठवाड्याच्या अन्य भागांमध्ये असणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण परभणी जिल्ह्यामध्येही पसरले आहे. मराठवाड्यामध्ये चार वर्षांच्या दुष्काळानंतर, गेल्या वर्षी पावसाने हजेरी लावली. मात्र, शेतमालाच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.