म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्ते, पाणी, ड्रेनेजसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत पहाडसिंगपुरा येथील नागरिकांनी सोमवारी पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
अमोदी हिल्स, स्वप्नपूर्ती कॉलनीमधील रहिवाशांनी साखळी उपोषण केले. या वेळी पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभापती जयश्री कुलकर्णी यांनी पंधरा दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मागील अकरा वर्षांपासून वॉर्ड क्रमांक-बारा पहाडसिंगपुरा येथील या परिसरामध्ये राहत आहोत. 'एनए-४४' ले-आऊटची घरे खरेदी केली आहेत. त्यानंतर रस्ते, पाणी, ड्रेनेज अशा कोणत्याच पायाभूत सुविधा येथे पुरविण्यात आलेली नाही. पालिका हद्दीत असतानाही अकरा वर्षांपासून पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. पाच दिवसांपुर्वी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागले.' यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा महिला प्रदेश सहप्रमुख छाया भोसले, प्राजक्ता आठवले, अलका हिवराळे, प्रज्ञा घाडीगावकर, करुणा गोले, नंदा सुर्वे, विजया सुखदेवे, दीपक नागावडे, अन्नपूर्णा कामे, रवींद्र शेजवळ, विजय आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.