म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते आणि सदस्यांनी विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपातील पक्षपात, अखर्चित निधी, पाणी पुरवठ्याच्या योजना, जि.प.च्या मालमत्ता आदी विषयांवर तब्बल तासभर बैठक झाली. यावेळी अतिरिक्त अशोक सिरसे यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, निधी वाटपात भाजप सदस्यांना डावलण्यात येत असल्याचे प्रकरण भाजप नेत्यांनी गांभिर्याने घेत सत्ताधारी शिवसेना - काँग्रेसने विकासकामात राजकारण आणू नये, असा इशारा दिला.
जिल्हा परिषदेत भाजपचे २३ सदस्य आहेत. सत्ताधारी शिवसेना - काँग्रेस आघाडी निधी वाटप करताना भाजप सदस्यांवर अन्याय करते, असा आरोप आहे. विकासकामासाठी समप्रमाणात निधी मिळावा, यासाठी भाजप सदस्यांनी २९ जून रोजी उपोषणही केले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन सांयकाळी मागे घेण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार गटनेते शिवाजीराव पाथ्रीकर यांच्यासह एल. जी. गायकवाड, रेखा नांदूरकर, उषा हिवाळे, रामदास परोडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची भेट घेत निधी वाटप प्रकरणासह अन्य प्रश्नांवर चर्चा केली. त्यावर निधी वाटपात असमानता असल्याचे मान्य करत सीईओंनी यापुढे असे होणार नाही. तालुका आणि भौगोलिक क्षेत्राच्या निकषानुसार निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच अखर्चित निधीबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. इतर मागण्यांच्या अनुषंगानेही सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे कौर यांनी सांगितल्याचे गायकवाड 'मटा'शी बोलताना सांगितले.
विकासकामात राजकारण नको
निधी वाटप प्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी झेडपीतील भाजप सदस्यांची एक बैठक घेतली. २३ पैकी ९ सदस्यांच्या सर्कलमध्ये एकही पैसा विकासकामासाठी देण्यात आला नाही, असे घेतलेल्या आढाव्यातून समोर आल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. सत्ताधारी शिवसेना - काँग्रेसने विकासकामात राजकारण आणू नये, असा इशारा डॉ. कराड यांनी दिला असून याप्रश्नी लवकरच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.