म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर
वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, वाळूज, इटावा येथील अन्नदान करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना शासनातर्फे धान्य देण्यात येणार आहे. यासाठी गंगापूर तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धान्याची मागणी केली आहे.
वाळूज परिसरात राहणाऱ्या परराज्यातील, परजिल्ह्यांतील कामगार 'लॉकडाऊन'मुळे अडकलेले आहेत. यातील अनेक कामगार रोजंदारीवर काम करणारे आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. या संस्था अन्नदान करीत आहेत, मात्र आता गरजूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सानप यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या कामगारांच्या आरोग्याची व जेवणाची काळजी घेण्याच्या सूचना मंडळाधिकारी, तलाठी यांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी २१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून धान्याची मागणी केली आहे. या परिसरातील सहा सेवाभावी संस्थांचे नावे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केली असून, त्यांना प्रत्येकी दररोज दोन क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू, २० किलो तूरडाळ असे साहित्य देण्यात येणार आहे.
खाऊचे पैसे अन्नदानासाठी
करोना विषाणू संसर्गाला अटकाव करण्यासाठी 'लॉकडाऊन' लागू करण्यात आले. या कालावधीत मदत करण्यासाठी अनेक दानशूर हात पुढे आले आहेत. एक महिना उलटून गेल्यानंतरही 'लॉकडाऊन' सुरूच असल्याने गरजूंची संख्या वाढत आहे. अनेकजण रस्त्यावर अन्नसाठी फिरत असल्याचे चित्र सध्या वाळूज औद्योगिक वसाहतीत दिसत आहे. अशा परिस्थितीत साजापुरातील या दोन मुलींनी जमवलेले खाऊचे पैसे अन्नदानासाठी दिल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य कलीम शेख व पंढरपूरचे सरपंच अख्तर शेख, नजीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.